Mumbai Local News Update: मुंब्रा येथे झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. लवकरच मुंबईतील लोकल फेऱ्या दुप्पट होणार आहेत. त्यामुळं मुंबईकरांचा प्रवास आता आरामदायी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासाठी रेल्वे विभागाने यंदा 81 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून, एकट्या मुंबई व एमएमआरमध्ये आजघडीला 16 हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या तीन वर्षात दुप्पट केली जाईल, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
मुंब्रा अपघातानंतर लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे काम जोरात सुरू आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेल्या पहिल्या लोकलची चाचणी घेतली जाईल, अशी माहितीदेखील अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तसंच, मुंबईत सध्याच्या सुमारास एकूण 3200 फेऱ्या दररोज होतात. त्या फेऱ्या आणखी वाढवण्याच्या हेतूने काम सुरू आहे. टप्याटप्याने सुमारे 300 अतिरिक्त लोकल ट्रेन सोडल्या जातील. म्हणजेच दैनंदिन सेवांमध्ये वाढ होणार आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
दरम्यान, सध्या तीन मिनिटांच्या अंतराने दोन लोकल धावतात. या दोन्ही लोकलमधील अंतर कमी करण्यात येईल. मुंबईतील दोन लोकलमधील अंतर तीन मिनिटांवरून अडीच मिनिटांवर आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणणार आहेत. अशा प्रकारची यंत्रणा असणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरणार आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. सध्या रोज 3,200 उपनगरी लोकलमधून 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. सुमारे 300 किलोमीटर नवीन ट्रॅक टाकण्यासह पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे वाढीव सेवा शक्य होतील, अशी माहिती समोर येतेय.
रेल्वे मार्गावरील तांत्रिक अडचणी दूर करत तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन्सना कवच प्रणालीबरोबर कम्बाइन कम्युनिकेशन्स बेस्ड कंट्रोल ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणेशी जोडण्यात येईल. सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षांत लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल. त्याचबरोबर 350 नवीन एसी लोकल सुरू करणार आहोत, असंदेखील त्यांनी म्हटलं आहे.
पश्चिम रेल्वेच्या सर्व प्रवासीआणि मालगाड्यांच्या 978 इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनमध्ये सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सहा हजार कॅमेरे बसवले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांची अंदाजे किंमत सुमारे १०० कोटी रुपये असेल. हे कॅमेरे 360 अंशाच्या कोनातून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवतील. त्यामुळे रुळांपासून इंजिनच्या आततील हालचाली टिपल्या जातील. या कॅमेऱ्यांमुळे अपघाताचे कारण शोधणे सोपे होणार आहे.