Mumbai Metro Update: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या वर्षात कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेचे काम हाती घेण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या मेट्रो मार्गिकेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी 'एमएमआरडीए'कडून लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे. त्यामुळं लवकरच बदलापूरकरांना मुंबईत येण्याचा प्रवास सोप्पा आणि आरामदायी होणार आहे.
एमएमआरडीएकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या या सल्लागाराला पर्यावरण मंजुरी घेण्याचेही काम करावे लागणार आहे. सल्लागार नियुक्तीसाठी 'एमएमआरडीए'ने निविदा मागविल्या आहेत. मेट्रो मार्गिका 14 ही 38 किमी लांबीची असून या मेट्रोवर 15 स्थानके असणार आहे. मेट्रो कुठून ते कुठपर्यंत धावणार आणि नागरिकांचा त्याचा काय फायदा होणार, जाणून घेऊया.
अंबरनाथ आणि बदलापूर येथे दिवसेदिवस गर्दी वाढत चालली आहे. या गर्दीचा ताण लोकलवर पडतोय. बदलापूर येथे जाण्यासाठी रस्तेमार्गे दीड ते दोन तास लागतात. तसंच, लोकलाही दररोज मोठ्या संख्येने गर्दी असते. यामुळंच मेट्रोने बदलापूर थेट मुंबईशी जोडण्यात येणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो प्रकल्पामुळं अंबरनाथ-बदलापूर हा भाग या मेट्रोमुळे थेट नवी मुंबई-ठाणे-भिवंडी या शहरांशी जोडला जाणार आहे.
मेट्रो बदलापूर, अंबरनाथ, निलजे, शिळफाटा, महापे, घणसोली या भागातून पुढे जाऊन अखेरीस ठाणे खाडी ओलांडून कांजूरमार्ग येथे मुंबईच्या हद्दीत पोहोचेल. या मार्गावर एकूण 15 स्थानके असतील त्यातील 13 उन्नत स्थानके असणार आहे. या मेट्रोचा रहिवाशांना मोठा फायदा होणार आहे.
45 किमी मेट्रो मार्गावर दोन्ही थांब्यांवरून प्रत्येकी 15 स्थानके, 13 उन्नत स्थानके आणि 1 भूमिगत स्टेशन असतील. बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो 14, वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो 4, स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी-कांजूरमार्ग मेट्रो 6, कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन आणि इतर 3 ठिकाणे इंटरचेंज करून जोडली जातील