Mumbai Local Train Update: मुंबईतील मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर एमएमआरडीएने मोठा निर्णय घेतला आहे. मुंब्रा येथे अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. लोकलमधील गर्दी आणि त्यामुळं अनेक जण लोकलच्या दारात उभे होते. त्यामुळंच हा अपघात घडला आहे. त्यामुळं लोकलमधील गर्दीचा ताण हलका व्हावा यासाठी एमएमआरडीएने पाउल उचललं आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लाइन 5 आता उल्हासनगरमार्गे अंबरनाथपर्यंत नेण्यात येणार आहे. श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे की, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 प्रकल्प आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गाने उल्हासनगर आणि अंबरनाथ शहराच्या मध्यभागी उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना मुंबई आणि ठाणे गाठणे सोपे होणार आहे. याबाबत एमएमआरडीएला जलदगतीने विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
'चिखलोली येथे होणार रेल्वे-मेट्रो इंटिग्रेशन. यामुळे एकाच ठिकाणी रेल्वे व मेट्रो सेवा उपलब्ध होणार असून प्रवाशांना सहज, जलद आणि सुसंगत प्रवास करता येणार आहे. या दोन्ही मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड परिसरात थेट मेट्रो सेवा उपलब्ध होणार असून बदलापूर-अंबरनाथहून मुंबई - ठाणे प्रवास सुलभ होणार आहे. तर यामुळे लोकल ट्रेनवरील ताण कमी होणार असून वाहतुक जलदगतीने होणार आहे. तसेच वेळ, इंधन आणि पर्यावरण यांची मोठी बचत होणार आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे.
एमएमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांच्या मुख्य उपस्थितीत आज एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) June 13, 2025
- ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ प्रकल्प आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गाने उल्हासनगर… pic.twitter.com/5nZCFZiPCf
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका 24.9 किमी लांबीची आणि साडेआठ हजार कोटी खर्चाची मार्गिका आहे. या मार्गिकेवर 17 मेट्रो स्थानके असून ठाण्यापासून मेट्रो सुरू होणार आहे. सुरूवातीच्या आराखड्यानुसार मेट्रो ठाण्याला सुरू होऊन कल्याणपर्यंत धावणार होती. मात्र आता मेट्रोचा विस्तार होऊन थेट खडकपाडा ते उल्हासनगरपर्यंत मेट्रो जाणार आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा मेट्रो मार्गिकेचा विस्तार करण्यात आला असून आता मेट्रो मार्गिका थेट अंबरनाथपर्यंत जाणार आहे. मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात होणार आहे.