Mumbai Monsoon Update : पाऊस आला की वातावरण आल्हाददायक होतं मात्र मुंबईकरांना धडकी भरते. रस्ते जलमय होतात, रेल्वे रूळ पाण्याखाली जातात. सर्वत्र पाणी भरतं त्यामुळे पावसाळा मुंबईकरांना खरं तर संकट वाटतं. पण मुंबईकरांवर दरवर्षी ही वेळ येते ती प्रशासनाच्या अनास्थेमुळे. नालेसफाईचे कितीही दावे केले तरी फोल ठरतात. पहिल्याच पावसात तुंबलेली दृश्य त्याचचं उदाहरण आहे. (Mumbai Monsoon Update Mumbai Tumbapuri in the first rain bmc claims of drain cleaning are false)
मुंबईत नैऋत्र्य मोसमी पावसाचं आगमन झालं, अशी आनंदवार्ता जरी हवामान विभागानं दिली असली तरी मुंबईकरांना मात्र धडकी भरलीय. रात्रीपासून होणा-या पावसानं मुंबईची तुंबई झाली. हिंदमाता, अंधेरी सबवे, किंग्ज सर्कल अशा ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी भरलं. राज्याचा कारभार जिथून हाकला जातो, त्या मंत्रालय परिसरातही पाणीच पाणी झालं. चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर इतकंच काय केईएम रूग्णालयातही पाणी शिरलं. बाकी परिसर जलमय झाले होतेच. आता पहिल्याच दिवशी पावसानं धो धो सुरूवात केल्यानं आधीच कमकुवत असलेल्या प्रशासनाचे धाबे दणाणले. पावसाळी वातावरणात नालेसफाईचा मुद्दा पुन्हा तापलाय. मुंबईची नालेसफाई झालीच नाही, असा आरोप केला जातोय.
भाजप सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे मुंबईत पाणी साचलं, असा थेट निशाणा आदित्य ठाकरेंनी सरकावर साधला. विरोधकांनी केलेल्या आरोपांना मंत्री गिरीश महाजनांनी उत्तर दिलं. यावेळी मॉन्सून लवकर आल्याचं सांगत परिस्थिती नियंत्रणात आहे, असं ते म्हणाले. एकनाथ शिंदेंनीही महाजनांप्रमाणे पावसाकडेच बोट दाखवलंय. नालेसफाईसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, तरीही पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचतंच. या दुष्टचक्रातून सुटका कधी होईल, याची मुंबईकर वाट पाहत आहेत.