Mumbai News : मुंबई... कोणासाठी हे शहर म्हणजे म्हणजे एक भावना, तर कोणासाठी आधार. अशा या मुंबई शहराचा चेहरामोहरा मागील 10 -15 वर्षांमध्ये इतका बदलला, की पाहणाऱ्यांना विश्वासच बसेना. मध्यमवर्गीयांची वस्ती मोठ्या प्रमाणात असणाऱ्या या शहरात तितकेच उच्चभ्रूही वास्तव्यास आहेत. पण, सध्याच्या एकंदर हालचाली आणि शहराच्या प्रगतीचा वेग पाहता, काही आर्थिक कारणांअभावी मध्यमवर्गीयांना मुंबईत घर घेण्याचं स्वप्नही पाहवत नाहीय. यास कारण ठरताहेत ते म्हणजे शहरातील घरांचे गगनाला भिडणारे दर.
बहुतांश भूखंडांवर सध्याच्या घडीला विकासकांनी आलिशान इमारती बांधत तिथं असणाऱ्या घरांचे दर कोट्यवधींच्या घरात ठेवल्यानं सामान्य नागरिकांकांना या मुंबई शहरात घर घेणं अशक्य होत आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. परिणामी कोट्यवधींची कोटींची किंमत असणाऱ्या या इमारतींमधील घरं सामान्य मराठी माणसाच्या आवाक्यात आणण्यासाठी मराठी माणसाला घर खरेदीसाठी आरक्षण देण्यात यावं अशी मागणी सध्या जोर धरताना दिसत आहे. ‘पार्ले पंचम’ या संस्थेने पुन्हा एकदा ही मागणी उचलून धरली असून, हीच मागणी करणारं पत्र संस्थेनं शिवसेनेच्या दोन्ही गटांतील मुंबईतील सर्व आमदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या या मागणीपर पत्राची चर्चा सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करावी अशी या संस्थेची भूमिका आहे.
‘पार्ले पंचम’ संस्थेच्या मागणीनुसार जिथं जिथं नव्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे तिथं घरांचं बुकिंग सुरू झाल्यानंतर मराठी लोकांसाठी 50% घरं वर्षभरासाठी आरक्षित ठेवावीत. वर्षभराच्या कालावधीनंतरही जर, ही घरं खरेदी केली गेली नाहीत तर बिल्डर/ विकासकाने ती कोणालाही विकण्याची परवानगी द्यावी. असं केल्यानं आर्थिकदृष्ट्या सक्षम मराठी नागरिकांना हक्काचं घर सहज खरेदी करता येईल.
निर्माण केल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन इमारतीतील 20 टक्के फ्लॅट तुलनेनं लहान आकाराचे तयार करावेत. म्हणजे त्या घराची किंमत आणि देखभाल खर्च सामान्य मराठी माणसाच्या अवाक्यात असेल. शिवाय कमी आकाराचे हे फ्लॅट 100% मराठी लोकांसाठी एक वर्षासाठी असावेतच अशा मागणीसह म्हाडाद्वारे बांधल्या जाणाऱ्या इमारतीत मराठी माणसाला प्राधान्य द्यावे हा मुद्दासुद्धा या मागणीत्रामध्ये अधोरेखित करण्यात आला.