Mumbai News : मुंबईच्या रस्त्यांवर कशा पद्धतीने खड्ड्यांचं साम्राज्य आहे याचा प्रत्यय आज गिरगावमध्ये आलाय. गिरगाव मेट्रो स्थानक परिसरात बेस्टची बस चक्क पाच फुट खोल खड्ड्यात अडकली. तातडीने प्रवाशांना बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. मात्र यावरून मुंबईतील रस्त्यांची अवस्था खाय झालीय हे समोर आलंय. मुंबईच्या गिरगावमधील मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताची दृश्य अंगावर काटा आणणारी आहे. अचानक रस्ता खचल्याने बेस्टची ही बस तब्बल पाच फुट खोल खड्यात अडकली. तब्बल 6 फूट लांब आणि 5 फूट खोल असा हा खड्डा. बसचं चाक खड्ड्यात अडकलं आणि बसचं चाक थेट पाच फुटांपर्यंत खोल गेलं.
ही भली मोठी बेस्टची बस कशी या खड्ड्यात अलगत बसलीय, जणू खड्ड्याने ही बस गिळलीच आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमधील प्रवासीही घाबरून गेले. मात्र तातडीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळलीय.. या परिसरात मेट्रो 3 चं काम सुरू आहे आणि त्यातच मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इथली जमीन कमकुवत झाल्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईकरांचे जीवन बेभरवशाचं असल्याचं म्हणत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सरकारवर निशाणा साधलाय. तर मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे असं म्हणत संदीप देशपांडे यांनीही रस्त्याच्या निकृष्ट दर्जावरून टीकास्त्र डागलंय.
गिरगावात झालेल्या या बसच्या अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी दिलंय. दरम्यान या अपघातानंतर मुंबई मेट्रो रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जारी करत स्पष्टीकरण दिलंय.
- गिरगावमध्ये प्रस्तावित पुनर्वसन इमारतीच्या तळघरात पाणी झिरपत असल्याचं आढळून आलंय
- बांधकामाजवळ कुठे तरी पाणी गळती होत असल्याची शक्यता प्रशासनाने वर्तवलीय
- जमिनीचा काही भाग खचल्याने खाली पोकळी निर्माण झाली
- पालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून नक्की गळती कशामुळे होतेय याचा शोध सुरू आहे
- गळती शोधून दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत
पहिल्याच पावसात झालेल्या या अपघातावरून मुंबईच्या रस्त्यांची अवस्था आपल्याला दिसून येतेय. ज्या परिसरात मेट्रोची कामं सुरू आहेत अशा सर्वच परिसरातील रस्त्यांचं ऑडिट होणं गरजेचं आहे.