Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. एप्रिल 2025 मध्ये नवी मुंबई येथे निर्माण करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होईल. तर, 15 मे पासून विमानसेवा सुरू होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे 2029 पर्यंत मुंबईचे T-1 टर्मिनल बंद राहणार आहे. यामुळे मुंबई विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवी मुंबई विमानतळ हा पर्याय उपलब्ध होणार आहे
विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) अध्यक्ष विपिन कुमार, नागरी विमान वाहतूक ब्युरो (बीसीएएस) प्रादेशिक संचालक प्रकाश निकम यांच्यासह नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए), अदानी विमानतळ होल्डिंग्ज (एएएचएल) आणि महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) यांचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली. यावेळी नवी मुंबई विमानतळाच्या कामाचे अपडेट या पथकाने घेतले. नवी मुंबई विमानतळाचे काम हे जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.
विमानतळाचे मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. 5 मार्चपर्यंत सर्व आवश्यक परवानग्यांसाठी अर्ज केला जाणार आहे. या तपासणीनंतर, विमानतळ ऑपरेटर आता विमानतळ परवान्यासाठी डीजीसीएकडे अर्ज करतील. वेळेत सर्व परवानग्या प्राप्त झाल्या तर 15 मे पासून विमानांना उड्डाण करण्याची परवानगी मिळू शकते अशी माहिती सुत्रांनी दिली.
मुंबई विमानतळावर प्रवाशांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून नवी मुंबई विमानतळ उभारण्यात येत आहे. 1160 हेक्टर परिसरात उभारण्यात येत आहे. या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांब असून या विमातळावर एकाचवेळी 350 विमाने उभी राहू शकतात. हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात. या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 2029 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा 2032 पर्यंत आणि चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल.
दरम्यान, मुंबई विमानतळाचे T1 टर्मिनल ऑक्टोबर 2025 पासून पुनर्बांधणीच्या कामासाठी बंद केले जाणार आहे. 2029 मध्ये मुंबईचे T-1 टर्मिनल पुन्हा सुरू होईल. पुनर्बांधणीच्या काम सुरु असेपर्यंत येथून प्रवास करणाऱ्या दीड कोटी प्रवाशांपैकी एक कोटी प्रवाशांची वाहतूक नवी मुंबई विमानतळावरुन केली जाणार आहे.