Raut On Pahalgam Attack Sharad Pawar: काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर तुम्ही सरकारबरोबर आहात. सरकारबरोबर म्हणजे तुम्ही सरकारच्या चुकांबरोबर आहात का? असा सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तसेच राज्यसभा खासदार शरद पवार यांना केला आहे. शरद पवारांनी पहलगाम हल्ल्यांसंदर्भात बोलताना सरकारला पूर्ण पाठिंबा जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधल्याचं आज पत्रकारांशी बोलताना पाहायला मिळालं.
"सरकारने ज्या चुका केल्या आहेत देशाच्या सुरक्षेसंदर्भात त्यावर कोणी बोलायचं?" असा सवाल राऊतांनी शरद पवारांना विचारला आहे. "शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार मंत्रिमंडळात होते. शिवराज पाटील यांनी बॉम्बस्फोट घडवले नव्हते ना पण त्यांची नैतिक जबाबदारी होती. म्हणूनच काँग्रेसने शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता. आम्ही सरकारच्या बरोबर आहोत असं कोण बोलत असेल तर बोलू द्या त्यांना," असा टोला राऊतांनी लगावला. "आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण युद्ध तर सुरू करा सरकार राजकारण करत आहे या सगळ्या गोष्टींचे," असंही राऊत म्हणाले.
"सरकारच्या बरोबर आहोत पण 24 तासात प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला! समर्थन करण्याच्या माननीय शरद पवारांना सांगू इच्छितो, काल प्रधानमंत्री मुंबईत आले. नऊ-दहा तास फिल्मी सितारे यांच्याबरोबर रंगले. मुंबई मनोरंजनाची राजधानी आम्हाला माहिती आहे. शाहरुख खान आमिर खान ही नटी ती नटी तो नट याचं समर्थन आम्ही करायचं आहे का? बसा दिल्लीमध्ये," असं राऊतांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, "सैन्यावर सगळी जबाबदारी टाकली आहे. भारतीय सैन्यावर इंदिरा गांधी यांनी सैन्यावर टाकली नाही. निर्णय दिला, आदेश दिला. मला युद्ध करायचे आहे. याला बोलतात राजकीय इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे का? अशा सरकारचा समर्थन म्हणजे कमजोरीचा समर्थन उडान टप्पू आणि टपोरीपणाचं समर्थन," असा घणाघात राऊतांनी केला आहे.
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना, "यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर पण दिसत नाही. काल पहा प्रधानमंत्री यांचा चेहरा तुम्ही एखाद्या प्रधानमंत्री यांनी हा कार्यक्रम रद्द केला असता. नट नटी यांच्या सोबतचा बिहार प्रचार दौरा रद्द केला असता. पण ते फिरत आहेत. मस्त मौला हरपण मौला त्याच्यावरती आम्ही बोलणार. ज्यांना सरकारचं समर्थन द्यायचा आहे या गोष्टीवरती त्यांनी द्यावे. ते जनतेच्या भावनाशी खेळत आहेत," असं राऊत म्हणाले.
"गृहमंत्री अमित शहा या सर्व घटनांना जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा प्रधानमंत्री यांनी घ्यायला हवा. तुम्ही शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता. आर. आर. पाटील यांचा राजीनामा घेतला होता मग आर. आर. पाटील यांचा राजीनामा पवार साहेब यांनी का घेतला होता जर त्यांना अमित शहा यांचा राजीनामा नको? महाराष्ट्रातल्या 26/11 च्या हल्ल्यानंतर लोक भावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी या राज्याचे गृहमंत्री असलेले आर आर पाटील यांचा राजीनामा घेतला. काँग्रेसने विलासराव देशमुख यांचा राजीनामा घेतला दहशतवादी हल्ल्यानंतर हे विसरू नका आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे. मी इतिहासाला धरून बोलत आहे या जनभावना आहेत. आर. आर. पाटील यांचा राजीनामा घेतला. विलासराव यांना राजीनामा द्यायला लावला. काही गरज नसताना त्यांनी अमित शाह यांच्या समर्थन करू नये," असंही राऊत शरद पवारांवर निशाणा साधला म्हणाले.