Kalyan Crime News : दिवसेंदिवस कल्याण परिसरातील गुन्हे वाढत जात असल्याची घटना घडत आहे. अशातच आता एक कल्याण स्टेशन परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण स्टेशन परिसरात देहविक्रय व्यवसाय चालविणाऱ्या तिघांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोन महिला असून एक पुरुष आहे. अटक केलेल्या आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असून आता न्यायालयाने तिघांना 17 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या 9 महिलांची सुटका करण्यात आली आहे. या 9 महिलांना उल्हासनगरातील शांतीसदन या महिला वस्तीगृहात ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणी आरोपी तौफीक हिमायद सैय्यद ऊर्फ टोप्या, रिहाना ख्वाजा शेख आणि सुमय्या अब्दुल रेहमान शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तौफीक उल्हासनगरमधील रहिवासी आहेत. तर सुमय्या हा नांदिवली येथील रहिवासी आहे. रिहाना अंबरनाथमधील झोपडपट्टीत राहते.
महात्मा फुले पोलिसांची मोठी कारवाई
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात खुलेआम देहविक्रय होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर महात्मा फुले पोलिसांनी सापळा रचून या परिसरात छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी 9 महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्यामध्ये या महिलांना मालकाने फसवणूक करून त्यांच्याकडून देहविक्रय व्यवसाय करून घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या या तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये अनेक घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे देखील मोठा वाद निर्माण झाला होता.