Mumbai News : मुंबई शहरानं कायमच बड्या गुंतवणूकदारांचं लक्ष वेधलं आहे. क्षणाक्षणाला कायापालट होणाऱ्या या शहराच्या कक्षासुद्धा इतक्या वेगानं रुंदावल्या आहेत की त्याची व्याप्ती पाहताना थक्क व्हायला होतं. अशा या मुंबई शहरात आजवर अनेक असे संपत्तीचे व्यवहार झाले आहेत, ज्यांचा आकडा ऐकल्यानंतरच अनेकांच्या भुवया उंचावल्या. असाच एक व्यवहार सध्या सर्वांचं लक्ष वेधताना दिसत असून हा व्यवहार झाला आहे मुंबईशेजारच्या ठाण्यात.
मुंबईलाही लाजवेल असा हा व्यवहार ठाण्यात झाला असून तिथं रिअल इस्टेट अर्केड डेव्हलपर्सचं नाव त्यात पुढे येत आहे. या विकासकांकडून 13 जून रोजी ठाण्यातील 6.28 एकर भूखंड ₹172 कोटींना खरेदी केल्याची माहिती जारी केली. कंपनीच्या निवेदनानुसार, त्या भूखंडावर सुमारे ₹2000 कोटींचा प्रचंड ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू (GDV) असलेला एक बहुउद्देशीय प्रकल्प विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. यामध्ये RERA विक्रीयोग्य क्षेत्र 9.26 लाख चौरस फूट इतंक असेल असंही सांगण्यात येत आहे.
कंपनीच्या माहितीनुसार हा भूखंड ठाणे पश्चिमेतील घोडबंदर रोडलगत कासारवडवली इथं आहे. या परिसरामध्ये 2, 3 आणि 4 बीएचके घरांसह व्यावसायिक जागेचाही विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) समोरच असल्यानं घोडबंदर रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे यांच्याशी तो सहजगत्या जोडला गेला आहे.
कांजुरमार्ग, मुलुंड आणि भांडूप यांसारख्या मध्यवर्ती भागांमध्ये कंपनीची उपस्थिती पाहता आता ठाणे क्षेत्रात झालेला हा प्रवेश कंपनीच्या विकासातील एक महत्त्वाचं स्थान आहे असं आर्केड डेव्हलपर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अमित जैन यांनी स्पष्ट केलं. ठाण्याच्या सर्वांगीण विकासाकडे त्यांनी यावेळी सर्वांचं लक्ष वेधलं.
ठाणे वेगाने विकसित होत असून तिथं असणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये आगामी मेट्रो लाईन्स आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. ज्यामुळं हे ठिकाण निवासी आणि सोबतच व्यावसायिक प्रकल्पांसाठी एक प्रमुख विकास केंद्र म्हणूनही उदयास येत असल्याचं ते म्हणाले. यावेळी कंपनीकडून प्रस्तावित मेट्रो लाईन 4 आणि ठाणे-बोरिवली भुयारी बोगदे या प्रकल्पांचं महत्त्वं अधोरेखित करत त्यांमुळं मोठा बदल घडवून येणार असल्याची आशासुद्धा व्यक्त केली. मागील काही वर्षांमध्ये घोडबंदर रोड परिसरामध्ये गृहखरेदीदार आणि गुंतवणूकदारांचं सातत्यानं लक्ष असून अनेकांनीच इथं स्वारस्यही दाखवलं आहे. ज्यामुळं इथं येणारा प्रकल्प भविष्याच्या दृष्टीनंही महत्त्वाचं असल्याचाच पुनरुच्चार कंपनीनं केला.