Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'जेलमध्ये जायचं बळ नाही, मी मरेन... म्हणत वायकर मातोश्रीवर रडले' राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकात मोठा दावा

Sanjay Raut : खासदार रविंद्र वायकर याच्याबाबत संजय राऊतांनी केले मोठे गौप्यस्फोट. राजकीय वर्तुळात राऊतांच्या पुस्तकाचीच सर्वदूर चर्चा...   

'जेलमध्ये जायचं बळ नाही, मी मरेन... म्हणत वायकर मातोश्रीवर रडले' राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकात मोठा दावा

Sanjay Raut : शिवसेना UBTचे खासदार संजय राऊत यांचे 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचं शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना UBTचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी राज्कीय वर्तुळातील अनेक गौप्यस्फोट केले असून त्यामुळं बऱ्याचजणांच्या भुवया उंचावत आहेत.

राऊतांनी केलेल्या या गौप्यस्फोटांमध्ये त्यांनी शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्याबाबतही अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ईडीच्या अटकेच्या भीतीनं रवींद्र वायकर आणि त्यांचे कुटुंब मातोश्रीवर येऊन रडल्याचा दावा राऊतांनी केलाय. जेलमध्ये जायचं बळ नाही, मी मरुन जाईन किंवा मला आत्महत्या करावी लागेल अशी विनवणी वायकरांनी उद्धव ठाकरेंकडे केली असा दावाही राऊतांनी करत, शिवसेनेच्या शिंदे गटानं दबाव टाकल्यानं आणि भीतीनं वायकरांनी पक्ष सोडला असा दावा राऊतांनी त्यांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकात केला.

पुस्तकातील काही दावे....

वायकर शिंदे गटात गेले त्या क्षणीच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते. त्यांनी पक्ष सोडावा म्हणून त्यांच्यावरील हा दबाव होता. वायकर शिवसेनेच्या निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदारांपैकी एक, असल्याचं या पुस्तकात म्हटलं गेलं. 

रवींद्र वायकर यांच्या अनेक कौटुंबिक सोहळ्यांत ठाकरे कुटुंबाचा सहभाग असे असं सांगत जोगेश्वरीत ते सुप्रीमो नावाचा क्लब चालवत जो प्रत्यक्षात महापालिकेच्या जागेवर होता आणि तिथं अनेक लग्नसोहळे पार पडत असंही राऊतांनी पुस्तकामध्ये नमुद केलं. 

एकाएकी वायकर निशाण्यावर 

वायकर नेमके कसे अडकत गेले याविषयी सांगताना राऊतांनी सोमय्यांचाही उल्लेख केला. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अचानक वायकर यांना टार्गेट करायला सुरुवात केली. रायगड जिल्ह्यातील जमिनींच्या तुकड्यांवर नऊ बंगले बांधले असल्याचं फेक नरेटिव्ह पसरवलं आणि हे बंगले ठाकरे कुटुंबाचे आहेत, असं भासवलं. हा मुद्दा अधोरेखित करत या प्रकरणी खोट्या गुन्ह्यांची नोंद झाल्याची बाब त्यांनी प्रकाशात आणली. 

पुढे ‘सुप्रीमो’च्या जमिनीबाबत नोंदी बदलल्याची बोंब ठोकून पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव आणला आणि पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेत वायकरांचा तपास सुरू केला. याच गुन्ह्याचा आधार घेत त्यात ईडीची एंट्री झाल्याचा दावाही राऊतांनी त्यांच्या या पुस्तकात केल्याचं म्हटलं जात आहे. रवींद्र वायकर यांना ईडी अटक करणार, असा धुरळा किरीट सोमय्या यांनी उडवताच वायकर आणि त्यांच्या कुटुंबाची गाळण उडाली, असे काही धक्कादायक गौप्यस्फोच राऊतांनी त्यांच्या या पुस्तकात केल्यानं आता येते काही दिवस हे आणि असे कैक गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणार हेच स्पष्ट होत आहे. 

Read More