Palava Bridge Dombivli Kalyan- Sheel Fata : वाहतूककोंडी हा सगळ्याच मोठ्या शहरातील प्रश्न झाला आहे. यासाठी सरकार मोठमोठे पूल, मेट्रो अशा अनेक गोष्टी तयार करत आहे. पण जनतेच्या फायद्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या या गोष्टींचं उद्घाटना अभावी वापरतात येत नाहीये. कल्याण-शिळ रोडवरील पलावा जंक्शन येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन नव्या लेन मार्चपासून प्रवाशांसाठी सुरू करण्याचं आश्वासन कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिलं होतं. मात्र, कामाची गती संथ असल्याने या पुलाचं उद्घाटन मे अखेरीस होणार असल्याचं पुन्हा सांगण्यात आलं. " कल्याण- शीळ रोडवरील पलावा जंक्शन रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन नव्या लेन येत्या मेपासून प्रवाशांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. सदरचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याने येथून लाखो वाहन धारकांना वाहतूक कोंडीपासून होणार त्रास कमी होणार आहे. मे अखेरीला हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल." अशी माहिती कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी त्यावेळी दिली होती.
फक्त तारीख सांगितली जाते उद्घाटन होत नाही यबद्दल आंदोलन करण्यात आले होते. या विलंबाविरोधात ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकत्र येत काही दिवसांपूर्वी गाजर व नोटा दाखवून आंदोलन केलं होतं. तरीही परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. आता जून महिना संपत आला तरी पुलाचं उद्घाटन झालेलं नाही. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून दीपेश म्हात्रे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप करत, "हे खोटारडे लोक आहेत, फक्त तारीख देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत." असे ते म्हणाले
डोंबिवलीकरांमध्ये यामुळे तीव्र नाराजी असून, वाशी व पनवेलला जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत . हा उड्डाणपूल अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. लेन कार्यान्वित झाल्यास कल्याण, डोंबिवली ठाणे आणि नवी मुंबईकडे प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता डोंबिवलीकरांचे लक्ष लागून आहे की, पुन्हा एकदा कुठली नवी तारीख दिली जाते आणि त्या दिवशी खरोखरच पुलाचं उद्घाटन होतं का?