छत्रपती शिवाजी पार्कात गुढीपाडव्याची जाहीर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी यावेळी चौफेर फटकेबाजी करत राजकीय नेत्यांनाही टोमणे मारले. यावेळी राज ठाकरे यांनी बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, संतोष देशमुख यांना किती घाणेरड्या पद्धतीने मारलं. तुमच्या नसानसांत इतकी क्रूरता असेल तर मी दाखवेन जागा. हे सगळं झालं कशातून विंड मिल, तिथली राख. मी आजवर ऐकलं होतं राखेतून फिनिक्स भरारी घेतो. बीडमध्ये राखेतून गुंड तयार होतो. संतोष देशमुखांनी या सगळ्याला विरोध केला. कारण विषय होता खंडणीचा. खंडणींचा विरोध करणाऱ्यांचा. आम्ही लेबलं काय लावली? वंजाऱ्याने मराठ्याला मारलं. यात जातींचा काय संबंध? राजकीय पक्ष तुम्हाला सातत्याने जातीपातीत गुंतवत आहेत. शेतकऱ्यांच्या दिवसाला सात आत्महत्या होत आहेत, रोजगार निर्मिती होत नाहीत, मराठवाडा सोडून तरुण-तरुणी पुण्यात येतात. या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हे सगळं चाललं आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला.
तुम्ही मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका. दिवसाला सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. लक्ष देऊ नका. रोजगाराकडे लक्ष देऊ नका. आपल्याला जातीपातीत अडकवलं. कोणी जातीचं भलं केलं नाही. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर इतकी वर्ष जास्तीत जास्त आमदार, मंत्री, मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? काय केलं या आमदारांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी. माझ्या मराठा समाजाला समजा आरक्षण मागावं लागत असेल तर एवढे आमदार, खासदार मुख्यमंत्री, मंत्री का निवडून दिले. त्यांनी काय केलं. जात जातीला कधीच सांभाळत नाही. फक्त मते घेण्यासाठी तुमचा वापर करतात, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.