गोविंद तुपे, मुंबई : पावसाचं आगमन झालं आहे, पण तरीदेखील मुंबईतील काही परिसरात नळाचे पाणी गायब आहे. पाण्याशिवाय दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. घरातील प्रत्येक कामासाठी पाणी आवश्यक आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात पुरेसे पाणी असूनही मुंबईतील कुर्ला परिसरात गेल्या आठवडाभरापासून नळांना पाणी आलेले नाही.
मुंबईतील कुर्ला परिसरातील प्रिमियर रेसिडन्सी या हाउसिंग सोसायटीत मागील एक आठवड्यापासून महापालिकेचे पाणीच आलेलं नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे 11 सोसायटी असलेल्या या संकुलात तब्बल 11 हजार पेक्षा जास्त लोक राहत आहेत. पण पाण्याच्या समस्येमुळे नागरिक पुरते हैराण आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील महापालिकेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिक हैराण आहेत.
या परिसरातील लोकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे. इथल्या लोकांना टँकरसाठी 50 हजारांचा खर्च होत आहे. या सोसायटीमधील नागरिकांना विकतच पाणी घेऊन गुजारा करावा लागत आहे. गेल्या 1 तारखेपासून पाणी अजिबात येत नाही आहे. जरी आलं तर फार कमी, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. सोसायटीमधील एका नागरिकाने सांगितलं की, दररोज टँकरचं पाणी मागवावं लागतंय. हे टँकरचं पाणी प्यायल्यामुळे अनेक लोक आजारी पडले आहेत. एका महिलेने थेट महापालिकेला प्रश्न विचारलाय की, जर लोक आजाराची पडले तर यासाठी कोण जबाबदार आहे.
या सोसायटीमधील लोकांनी महापालिकेविरोधात तक्रार केली आहे की, नेहमी कुठलं सण असला, कार्यक्रम असलं की महानगरपालिकेकडून पाण्याची समस्या निर्माण होते. उन्हाळ्यात तर ही समस्या प्रकर्षाने जाणवते. पण इतर वेळीही महानगरपालिकेकडून पाणी येत नाही. जेव्हा वेळी आम्ही इतर ठिकाणी पाहतो तिथे पाण्याची समस्या नाही. तिथे मुबलक प्रमाणात पाणी आहे. मग कुर्ला परिसरात पाण्याची समस्या का?
प्रिमियर रेसिडन्सीमधील रहिवाश्यांनी सांगितलं की, त्यांनी अनेक वेळा महानगर पालिकेमध्ये जाऊन पाण्याची समस्येबद्दल तक्रार केली आहे. पण त्यांच्याकडून उत्तर मिळतं की, पाण्याचा फ्लो बरोबर आहे. पण प्रत्यक्षात पाहिलं तर आमच्या बिल्डिंगमध्ये पाणी येत नाही. कधी कधी असं होतं की एक थेंब पाणी येत नाही. पण या परिसरात पाण्याची समस्या असल्याने ती शोधून काढून यावर उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे. दिवसेंदिवस कुर्ला परिसरातील प्रिमियर रेसिडन्सी या हाउसिंग सोसायटीत पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.