Marathi News> उत्तर महाराष्ट्र
Advertisement

शंभूराजांचा छळ झालेल्या किल्ल्याचं नाव बदलणार? 'हे' नाव देण्याची BJP आमदाराची मागणी

Rename Bahadurgad Chhatrapati Sambhaji Maharaj Connection: ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या गडाचं नाव बदलण्यासंदर्भातील निवेदन देण्यात आलं आहे.

शंभूराजांचा छळ झालेल्या किल्ल्याचं नाव बदलणार? 'हे' नाव देण्याची BJP आमदाराची मागणी

Rename Bahadurgad Chhatrapati Sambhaji Maharaj Connection: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले. अभिनेता विकी कौशलने या चित्रपटामध्ये संभूराजांची भूमिका साकारली असून या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या पडद्याच्या माध्यमातून पोहोचला. हा चित्रपट पाहताना अनेकांचे डोळे पाणावले. ज्या पद्धतीने औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांवर अत्याचार केला ते पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. चित्रपटगृहांमध्ये पडणाऱ्या प्रेक्षकांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्या किल्ल्यावर संभाजी महाराजांचा छळ झाला त्या गडाचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

भाजपा आमदाराने केली गडाचं नाव बदलण्याची मागणी

संगमेश्वरमधील सरदेसाईंच्या वाड्यामध्ये औरंगजेबच्या फौजेने कट करुन छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यात दौंडजवळील श्रीगोंदा येथील 'बहादूर गड' येथे आणण्यात आलं. याच ठिकाणी औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार केले. या गडाला स्थानिक लोक धर्मवीरगड तथा पेडगावचा किल्ला असंही म्हणतात. या गडाचं शासनाचं नाव सर्व प्रशासकीय दस्तावेजांमध्ये 'बहादूर गड' असं आहे. हेच नाव बदलण्याची मागणी आता भारतीय जनता पार्टीचे श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघांचे आमदार विकत्रमसिंह पाचपुते यांनी केली आहे. 

या आमदाराने काय म्हटलं आहे आपल्या निवेदनात?

भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी 'बहादूर गड'चे नाव बदलण्याची मागणी करणारं निवेदन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारांना दिले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ ज्या गडावर झाला त्याचं नाव मुघल सेनापती बहादूर खानऐवजी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असावं. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने या गडाची ओळख निर्माण करावी, अशी मागणी पाचपुते यांनी शेलारांकडे केली आहे. हा गड हिंदू धर्मासाठी प्रेरणास्थान असल्याचेही भाजपाच्या आमदाराने आपल्या निवेदनात नमूद केलं आहे.

गडाचं नाव कसं पडलं आणि इतिहास काय?

मुघल साम्राज्याच्या काळात पेडगाव हे मुघल सैन्याचे मुख्य ठिकाण होते. 1672 मध्ये दख्खनेतील मुघल सेनापती बहादूर खान (औरंगजेबाचा भाऊ) आणि त्याच्या मामाने येथे तळ ठोकला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा सैन्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न या दोघांनी इथं तळ ठोकून केला. भीमा नदीतून पाणी आणण्यासाठी बहादूरखानने या ठिकाणी जलवाहिनी बांधली. यासाठी या ठिकाणी बांधण्यात आलेली मोट आणि पर्शियन चाक आजही शाबूत स्थितीत आहे. बहादूर खानाने या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे ठेवले.

हंबीररावांची सरसेनापती म्हणून पहिली मोहिम याच गडावर झालेली

बहादूर खानाविरुद्ध स्वराज्यात पेडगावची मोहिम आखली गेली आणि त्या मोहिमेचे प्रमुख सरदार स्वतंत्र स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते होते. हंबीररावंसोबत अनाजीपंत, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे व त्यांचा मुलगा संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी नाईक व त्यांचा साथीदार नंदी इत्यादी महारथी होते. बहादूर खानाने लुटून आणलेले हिंदू देव-देवता परत आणण्याचा या पेडगाव मोहिमेचा खरा उद्देश होता. बहादूर खानाने लुटलेल्या देवी-देवतांमध्ये मोरगावचा मयुरेश्वर, कुरकुंभ गावची ग्रामदेवी फिरंगाईदेवी, आणि अनेक मंदिरांच्या कळसांचा समावेश होता. या मोहिमेत सरसेनापतींनी 9 हजारांच्या सेनेच्या दोन तुकड्या केल्या होत्या, त्यापैकी स्वतःसोबत त्यांनी 2 हजारांची सेना आणि बाकीची 7 हजारांची सेना येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे आणि मोरोपंत पिंगळे यांना दिली होती. त्यांनी पेडगाव लुटायचा बेत आखला होता. बहादूर गडच्या मुख्य दरवाजावर त्यांची 7 हजार जणांची सेना उभी केली. त्यानंतर या सैनिकांना आदेश दिला कि बहादूर खानाची सेना आली तर उलटं जंगलात पळायचं म्हणजे इकडे त्यांना देव परत आणायला वेळ मिळेल आणि अशाप्रकारे हंबीररावांची सरसेनापती म्हणून पहिली मोहिम फत्ते झाली.

किल्ल्यात औरंगजेबाचा दुमजली महाल

आत औरंगजेबाचा दुमजली महाल आहे. 1759 मध्ये पेडगाव हे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी ताब्यात घेतले आणि ते 1818 पर्यंत म्हणजेच इंग्रजांच्या ताब्यात जाण्यापूर्वीपर्यंत हा किल्ला मराठ्यांकडे राहिला.

नेमका कुठे आहे हा गड?

बहादूर गड पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. हा गड श्रीगोंदा शहराजवळ आहे. हा किल्ला भीमा नदीच्या उत्तरेकडील श्रीगोंदा शहराच्या दक्षिणेस सुमारे 11 किलोमीटर (६.८ मैल) अंतरावर पेडगाव नावाच्या गावात आहे. हा किल्ला आयताकृती आकाराचा असून या किल्ल्याला आठ प्रवेशद्वारे आहेत. गावाकडे जाण्याचा दरवाजा आजही चांगल्या अवस्थेत आहे तर नदीच्या दिशेला असलेला दरवाजा मोडकळीस आलेला आहे. 'टीम धर्मवीरगड'च्या माध्यमातून या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. किल्ल्याच्या आत 5 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती आहे. या किल्ल्यामध्ये यादव काळात निर्माण झालेल्या 6 मंदिरांचा एक समूह आहे. हेमाडपंती मंदिरांमध्ये रामेश्वर, पाताळेश्वर, बालेश्वर, लक्ष्मी-नारायण, मल्लिकार्जुन, आणि भैरवनाथ यांच्या मंदिरांचा समावेश आहेत. भैरवनाथ मंदिरासमोर अनेक वीरघळ, सतीगळ, तोफांचे गोळे, दीपमाळ आणि शिव मूर्ती आहे.

Read More