Amitabh Bachchan Says If I Die: अमिताभ यांनी एका मुलाखतीमध्ये केलेले हे विधान सध्या चर्चेत आहे. हे विधान चर्चेत असण्यामागील कारण आहे नुकतीच समोर आलेली बच्चन कुटुंबुंबियांच्या संपत्तीची आकडेवारी. आमिताभ यांनी आपल्या मरणाचा उल्लेख करत नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात सविस्तरपणे...
अमिताभ बच्चन यांचं कुटुंब सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतं. सध्या हे कुटुंब त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत असतानाच अमिताभ यांनी केलेलं एक विधानही पुन्हा चर्चेत आलंय. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात...
अमिताभ बच्चन यांनी एकदा आपल्या संपत्तीसंदर्भात सूचक विधान केलं आहे. स्वत:च्या मरणचा उल्लेख करत त्यांनी हे विधान केलेलं हे विशेष.
अभिषेक-ऐश्वर्यादरम्यानच्या कथित वादामुळे बच्चन कुटुंब चर्चेत असतानाच त्यांच्या श्रीमंतीसंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे.
अमिताभ बच्चन यांचं कुटुंब नुकत्याच समोर आलेल्या हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 मध्ये देशातील चौथे सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी ठरलं आहे.
बच्चन कुटुंबाची एकूण संपत्ती 1600 कोटी रुपये इतकी आहे. असं असतानाच आता अमिताभ यांचं एक जुनं विधान चर्चेत आलं आहे.
2011 साली दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉलिवूडच्या या महानायकाने आपल्या मुलांच्या संगोपनाबद्दल भावना व्यक्त केलेल्या. आपण आपल्या मुलाला आणि मुलीला सारखेपणे वागवलं असून आपल्या मृत्यूपत्रामध्येही हे दिसून येईल असे संकेत त्यांनी दिलेले.
आपण आपली संपत्ती मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक या दोघांमध्ये सम-समान वाटणार असल्याचं अमिताभ यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. पत्नीला याची कल्पना असल्याचंही ते म्हणालेले. त्यांचे नेमके शब्द होते ते पाहूयात...
"मी एक गोष्ट ठरवली आहे. ती म्हणजे, मी कधीच या (श्वेता आणि अभिषेकमध्ये) दोघांमध्ये फरक करणार नाही," असं अमिताभ 'रेडीफ'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.
"जेव्हा मी मरेन त्यावेळी माझ्याकडे जे काही छोटं मोठं असेल त्याचे समान वाटा माझ्या मुलीला आणि मुलाला मिळेल. दोघांमध्ये कोणताही फरक केला जाणार नाही," असं अमिताभ म्हणाले होते.
"जया आणि मी फार पूर्वीच याबद्दल ठरवलं आहे. प्रत्येकजण म्हणतो की मुलगी ही दुसऱ्या घरची लक्ष्मी असते. ती लग्नानंतर तिच्या नवऱ्याच्या घरी जाते, असंही म्हटलं जातं. मात्र माझ्या नजरेत ती आमची मुलगी असून तिला अभिषेक इतकेच अधिकार आहेत," असं अमिताभ यांनी म्हटलं होतं.
विशेष म्हणजे अमिताभ यांनी मागील वर्षीच आपला 'जलसा' नावाचा बंगला त्यांच्या मुलीच्या म्हणजेच श्वेता बच्चन नंदाच्या नावे केला होता. त्यावेळेस या बंगल्याची किंमत 50 कोटी रुपये इतकी होती.
अभिषेक बद्दल बोलताना अमिताभ यांनी तो माझा मित्र असल्याचं म्हटलं आहे. दोघांमधील बॉण्डबद्दल बोलताना अमिताभ यांनी, "मला मुलगा होण्याच्या फार आधीच मी ठरवलं होतं की मुलगा झाला तर तो केवळ माझा मुलगा नाही तर माझा मित्र असेल. ज्या दिवशी त्याला माझे शूज येऊ लागले त्या दिवशी तो माझा मित्र झाला," असं अमिताभ म्हणाले.
अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाचं आणि ऐश्वर्या रायचं पटत नसल्याची चर्चा मागील काही काळापासून सुरु असली तरी कोणीही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र संपत्तीच्या वाटपासंदर्भात अमिताभ आपली संपत्ती मुलगा आणि मुलीलाच देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.