बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयला अभिनय क्षेत्रात अपेक्षित यश लाभले नाही. मात्र त्याने हार न मानता व्यवसायात आपलं नशीब आजमावलं आणि आज तो एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखला जातो. त्याची एकूण संपत्ती पाहून कोणीही चकित होईल.
विवेक ओबेरॉयने अभिनय क्षेत्रात फार मोठी कामगिरी केली नसली, तरी व्यावसायिक क्षेत्रात जबरदस्त नाव कमावले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतरही अपेक्षित यश न मिळाल्याने त्याने आपला मोर्चा व्यवसायाकडे वळवला. आज त्याची एकूण संपत्ती तब्बल 1200 कोटी असून तो आता दुबईत स्थायिक झाला आहे.
एका यूट्यूब मुलाखतीत विवेकने सांगितले की, तो प्रथम कोविड-19 च्या काळात दुबईला गेला होता. तिथल्या सकारात्मक वातावरणामुळे प्रभावित होऊन, त्याने कुटुंबीयांसह दुबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय एकतर्फी नसून, सर्व कुटुंबीयांनी एकत्र बसून मतदान करून दुबई हेच आपलं नवीन घर असावं असं ठरवलं.
विवेक म्हणाला, 'मी सुरुवातीला फक्त काही काळासाठी आलो होतो. पण इथली ऊर्जा, हवामान आणि जीवनशैली इतकी आवडली की इथं कायम राहायचं ठरवलं. भारत आणि दुबईचं अंतर फारसं नाही, त्यामुळे पाहिजे त्यावेळी भारतात परतता येतं. गेल्या चार वर्षांत दुबई आमचं घरच बनलं आहे.'
विवेक सध्या दुबईतून एक लक्झरी रिअल इस्टेट कंपनी चालवत आहे. या कंपनीची अंदाजे किंमत 7 अब्ज डॉलर्स म्हणजेच 58,000 कोटी आहे. विशेष बाब म्हणजे ही कंपनी कोणत्याही कर्जाशिवाय म्हणजेच 'झिरो डेब्ट' मॉडेलवर कार्यरत आहे.
रिअल इस्टेट व्यतिरिक्त विवेकने लॅब-ग्रोउन डायमंड कंपनी 'सॉलिटारियो'मध्ये गुंतवणूक केली आहे, ज्याने मागील वर्षी सुमारे 100 कोटींचा व्यवसाय केला. त्याशिवाय, त्याने एका प्रीमियम जिन ब्रँडमध्येही 21% हिस्सा घेतला आहे, ज्याची किंमत अंदाजे 315 कोटी आहे.
'फ्रँचायझी इंडिया'ला दिलेल्या एका मुलाखतीत विवेकने सांगितले की, तो अशा स्टार्टअपचा भाग आहे जे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फायनान्सिंग पुरवतो. या कंपनीची एकूण किंमत 3400 कोटी आहे. या स्टार्टअपमुळे लाखो विद्यार्थ्यांना आधार मिळाला आहे.
दुबईबद्दल बोलताना विवेक म्हणतो, 'जर तुम्ही स्थानिक कायदे आणि संस्कृतीचा आदर केला, तर तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. इथे लोकांना त्यांच्या पद्धतीने यशस्वी होण्याचं स्वातंत्र्य आहे.'
बॉलिवूडमध्ये मोठं नाव न कमावता, विवेकने स्वतःसाठी व्यवसायात ठोस स्थान निर्माण केलं. त्याच्या यशस्वी वाटचालीतून हेच दिसून येतं की कठोर मेहनत कधीच वाया जात नाही. वेळ आली की ती फळ देतेच.