Indian Culture : भारतातील 'या' राज्यात अजूनही कुटुंबातील सर्व भाऊ करतात एकाच मुलीशी लग्न; काय आहे ही प्रथा?
लग्न हे पावित्र्याचं एक बंधन मानलं जातं. भारतात विवाहसंस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्वं असून, सहजीवनाची ही पहिलीच पायरी असते. विविध राज्यांमध्ये विविध पद्धतींनी, यथासांग रितीरिवाजांनुसार लग्नविधी पार पडतात.
विविधतेनं नटलेल्या याच भारत देशात 'पांचाली' नावाची एक प्रथाही सुरु आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का? पांचाल प्रांताची राजकुमारी पांचाली आणि पांडवांचबद्दल तुम्ही या न त्या कारणानं काही संदर्भ ऐकलेच असतील.
अर्जुनानं स्वयंवर जिंकत जेव्हा पांचालीला सासरी आणलं तेव्हा माता कुंतीच्या मुखातून चुकून 'तू जे काही आणलंयस ते पाचही भावंडांमध्ये वाटून घ्या' असे शब्द निघाले आणि यात कारणामुळं पांचालीला पांडवांशी लग्न करावं लागलेलं. म्हणूनच या प्रथेला पांचाली असं नाव पडलं.
पांचाली प्रथेमध्ये एका महिलेला एकाहून अधिक पुरुषांशी लग्न करावं लागतं. भारतातील अनेक आदिवासी समुदायांमध्ये ही प्रथा प्रचलित होती. पण, सध्या मात्र पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हिमाचल प्रदेशात या प्रथेचं पालन केलं जातं असं म्हणतात.
हिमाचर प्रदेशातील किन्नौर भागामध्ये 'पांचाली विवाह' किंवा बहुपती विवाह प्रचलित आहे. जिथं महिला एकाच कुटुंबातील सर्व भावांशी लग्न करते. या प्रथेमागं अनेक कारणं आणि कथा सांगितल्या जातात. कुठं द्रौपदीचे पाच पती असल्याचं प्रतीक म्हणून या प्रथेचं पालन होतं.
कुठं, अशीही धारणा आहे की प्राचीन काळात भौगोलिक परिस्थितीमुळं या प्रथेची सुरुवात झाली. कारण, शेतात तेव्हा जास्तीत जास्त पुरुषांना काम करावं लागत होतं.
पुरुष कामानिमित्त घराबाहेर असताना महिला कुटुंब आणि मुलांची काळजी घेत. एका महिलेले अनेक पती असल्यामुळं कामं सोपी होत होती याच धारणेनं या प्रथेची सुरुवात झाली होती. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)