Relationship : लग्नसंस्कृतीमध्ये वाढत्या समस्या आणि जोडप्यांमध्ये असणारे मतभेद या साऱ्याचा परिणाम नात्यावर होताना दिसत असून, नाती तुटण्याची संख्या वाढत आहे हे भीषण वास्तव.
सहसा नात्यांमध्ये येणारा दुरावा किंवा अगदीच घटस्फोटापर्यंतचं पाऊल मतमतांतरं किंवा कौटुंबिक वाद या कारणांमुळं उदभवतो. पण, काही कारणं अशीही असतात, जी इतकी अनपेक्षित असतात की त्यांच्यामुळं एखादं नातं तुटू शकतं याचा अंदाजच येत नाही.
हल्लीच उत्तर प्रदेशातून एक प्रकरण समोर आलं जिथं महिलेनं पती अस्वच्छ असल्याचं कारण पुढे करत त्याच्या शरीरातून दुर्गंधी येत असल्याचं कारण पुढे केलं.
समुपदेशन केंद्रामध्ये जेव्हा पतीकडे चौकशी करण्यात आली तेव्हा पतीनं दिलेल्या माहितीनुसार तो महिन्यातून दोनदा अंघोळ करतो आणि अन्यथा तो गंगाजलाचा वापर करतो. पती- पत्नीच्या नात्यातील हा वाद आता घटस्फोटाच्या पायरीपर्यंत पोहोचला आहे.
कर्नाटकातील बल्लारी इथं एका व्यक्तीनं पत्नीला फक्त मॅगीच बनवता येते, सकाळ दुपार संध्याकाळ ती फक्त मॅगीच खायला देते म्हणून घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
उत्तर प्रदेशातील मेरठ इथं एक पत्नी दिवसभर पतीला फक्त लाडूच खाला देत असल्यामुळं दाम्पत्यानं 10 वर्षांचं वैवाहिक नातं संपवण्याचा निर्णय घेतला. पतीच्या तक्रारीनुसार पत्नी तिच्या पतीला जेवण न देता फक्त लाडूच खायला देत होती.
2020 मध्ये उत्तर प्रदेशातील संभल इथं एका महिलेनं शरिया न्यायालयात पतीविरोधात तलाकसाठी अर्ज केला होता. पती गरजेहून जास्त प्रेम करतो, भांडत नाही असं म्हणत आपण या अती गोड नात्याला कंटाळलो असल्याचं या महिलेचं म्हणणं होतं. न्यायालयानं या महिलेचा अर्ज फेटाळल्यानंतर तिनं पंचायतीमध्ये यासाठी धाव घेतली.
पती युपीएससी परीक्षेच्या तयारीत व्यग्र सअसल्यामुळं त्याला आपल्यासाठी वेळच नाही, असा सूर आळवत 2019 मध्ये भोपाळमध्ये एका पत्नीनं नात्यातील वाढता तणाव पाहता घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पण, समुपदेशनानंतर त्यांच्यातील हा वाद मिटवता आला.