ord: पाच वेळा आयपीएलचा चषक उंचावणाऱ्या रोहित शर्मा आणि धोनीलाही जे जमलं नाही ते श्रेयस अय्यरने करुन दा...
महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा या सारख्या पाच-पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्यांपासून ते विराट कोहलीपर्यंत अनेक कर्णधारांना जमलं नाही ते श्रेयस अय्यरने करुन दाखवलं आहे. त्याच्या नावावर नोंदवल्या गेलेल्या वर्ल्ड रेकॉर्डबद्दल जाणून घेऊयात...
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाचा आयपीएल 2025 च्या लीग स्टेजमधील दोन्ही संघांच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला. 11 वर्षानंतर पंजाबच्या संघाने प्ले ऑफपर्यंत धडक मारली आहे. विशेष म्हणजे पंजाबने आपलं दुसरं स्थान निश्चित केल्याने त्यांना अंतिम सामन्यासाठी पात्र होण्याच्या दोन संधी मिळणार आहेत.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबने केलेल्या या चमकदार कामगिरीमुळे श्रेयसच्या नावावर एक आगळावेगळा विक्रम नोंदवला गेला आहे. श्रेयसच्या नावाची आयपीएलच्या इतिहासात एका अनोख्या विक्रमासाठी नोंद झाली आहे.
सोमवारी मुंबईचा सात विकेट्स राखून पंजाबने पराभव केल्यानंतर पंजाबचा संघ प्ले ऑफसाठी स्थान निश्चित करत पात्र ठरणार पहिलाच संघ ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊन सुपर जायंट्सच्या लीग फेरीतील अखेरच्या सामन्याआधीच पंजाबचं पॉइण्ट्स टेबलमधील दुसरं स्थान निश्चित झालं आहे. आता फेरफार झाला तरी अव्वल चारपैकी पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर होईल.
श्रेयसच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ प्लेऑफमध्ये पात्र ठरल्याने श्रेयसने पाच वेळा आयपीएलची चषक जिंकणाऱ्या रोहित शर्मा, महेंद्र सिंग धोनी यांनाही न जमलेला विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.
पंजाब प्लेऑफमध्ये पात्र ठरल्याने श्रेयस असा एकमेव कर्णधार झाला आहे ज्याच्या नेतृत्वाखाली तीन वेगवेगळे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. या पूर्वी श्रेयसने दोन वेगळ्या संघांचं नेतृत्व करताना त्यांना प्लेऑफपर्यंत नेलं होतं.
श्रेयस अय्यर पहिल्यांदा 2018 साली दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. त्यानंतर त्याने 2020 मध्ये संघाचं नेतृत्व करताना त्यांना पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी पोहचवत प्लेऑफसाठी पात्र ठरवलं. या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात पोहोचलेल्या दिल्लीचा मुंबईच्या संघाने पराभव केला होता.
2024 च्या आयपीएलमध्ये श्रेयसने कोलकात्याच्या संघाचं नेतृत्व केलं होतं. श्रेयसच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत श्रेयसने कोलकात्याला तिसऱ्यांदा जेतेपद मिळवून देण्याची कामगिरी केली होती.
अभिनेत्री प्रिती झिंटाच्या मालकीचा पंजाबचा संघ पहिल्या पर्वापासून स्पर्धेचा भाग असूनही त्यांना कधीच आयपीएलचा चषक जिंकता आलेला नाही. त्यामुळेच आता श्रेयसच्या नेतृत्वाखाली तर पंजाबचा संघ जेतेपदावर नाव कोरणार का हे पाहवं लागणार आहे.
पंजाबच्या संघाला केवळ दोन वेळाच प्लेऑफमध्ये खेळता आलं आहे. 2008 आणि 2014 साली हा संघ प्लेऑफचे सामने खेळला आहे. यंदा श्रेयसच्या नेतृत्वाखाली ते 11 वर्षांनी प्लेऑफचा सामना खेळणार आहेत.
यंदाचं आयपीएल पंजाबने जिंकलं तर श्रेयस असा एकमेव कर्णधार ठरले ज्याने दोन संघांना आयपीएल चषक जिंकवून दिला. मागच्याच वर्षी त्याने कोलकात्याला चषक जिंकवून दिल्यानंतरही संघाने त्याला लिलावामध्ये विकत घेतलं नाही. 10 कोटींच्या बोलीनंतर केकेआरने त्याच्यावर बोली लावली नाही. तर दुसरीकडे पंजाबने त्याला 26.75 कोटींना विकत घेतलं. श्रेयसने मिळालेल्या संधीचं सोनं करुन दाखवलं.
विशेष म्हणजे इंग्लंडच्या दौऱ्यासाठी कसोटी संघात स्थान न मिळाल्याने श्रेयसचे चाहते नाराज असले तरी त्याच्या या कामगिरीमुळे त्यांच्या या दुखावर फुंकर मारली गेली आहे. असं म्हणण्यास हरकत नाही. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)