Indian Railways News In Marathi: रेल्वेच्या जनरल पॅसेंजरमधून तुम्ही प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता 20 रुपयांत तुमचं पोटभर जेवता येणार आहे. नेमका रेल्वेचा कोणता निर्णय आहे ते बघाच एकदा..
उन्हाळ्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशावेळी जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवण मिळत नसल्याने उपाशी पोटी प्रवास करण्याची वेळ येत होती. मात्र रेल्वे विभागाने जनरल डब्यातील प्रवाशांना बजेट फ्रेंडली जेवण उपलब्ध करुन दिलं आहे.
रेल्वे विभागाने जारी केलेल्या निवेदनात लांबपल्ल्याच्या 15 प्रमुख रेल्वे स्थानकांवर 20 रुपयात जेवण उपलब्ध करुन देणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील इगतपुरी, कर्जत, मनमाड, खंडवा, बडनेरा, शेगाव, पुणे, मिरज, दौंड, साईनगर शिर्डी, नागपूर, वर्धा, सोलापूर, वाडी आणि कुर्डूवाडी या स्थानकावर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फक्त 20 रुपयांत जेवण मिळेल. रेल्वेने यासंदर्भात निर्णय घेतला असून तसं निवेदन देखील जारी केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना 20 रुपयांत जेवण उपलब्ध होणार आहे.
यामध्ये जनरल डब्यातील प्रवाशांना इकॉनॉमी मील फक्त 20 रुपये दिले जातील. त्यात सात पुऱ्या आणि बटाटाची भाजी असणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांना 50 रुपयांत नाश्ता आणि दुपारचे जेवण देखील करता येणार आहे.
रेल्वे प्रवाशांना कमी पैशात, पौष्टिक आणि स्वच्छ अन्न मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जनरल डब्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरोग्यदायी अन्न, नाश्ता, कॉम्बो जेवण आणि पाणी बॉटल जनरल डब्याबाहेर पुरवल्या जातील. 20 रुपयांना मिळणाऱ्या इकॉनॉमी मीलमध्ये सात पुरी (175 ग्रॅम), सुक्या बटाट्याची भाजी, आणि लोणचं यांचा समावेश असेल.
तर 50 रुपयांना मिळणाऱ्या फराळासह जेवणाचे वजन 350 ग्रॅम आहे. त्यात दक्षिण भारतीय भात, राजमा-भात, खिचडी, कुलचे-भटुरा छोले, पावभाजी, मसाला डोसा दिला जाईल. 3 रुपयांत पिण्याचे पाणी दिले जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
गेल्या वर्षी 51 स्थानकांवर सेवेची चाचणी घेण्यात आली. चाचणीतील यशाच्या आधारावर रेल्वेने कार्यक्रमाचा विस्तार केला. आता 100 हून अधिक स्थानकांवर आणि एकूण 150 काउंटरवर आहेत.