अशक्य.... जमिनीखाली नव्हे, तर पाण्याखाली दफन झालेला हा महाल आहे तरी कुठे? निम्म्या इमारतीला जलसमाधी...
भारत हा एक असा देश आहे, ज्या देशाला एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. देशात असणारं राजेशाही पर्व हे त्याचच एक उदाहरण असून, कायद्यानं संस्थानं खालसा झाली असली तरीही त्यांना मिळणारा मान, त्यांच्याविषयी वाटणारं कुतूहल आजही कायम असल्याचं पाहायला मिळतं. अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देशामध्ये एक राज्य असंही आहे जिथं आजही कैक वर्षांपूर्वीचे गडकिल्ले भक्कम स्थितीत उभे असून, ते इतिहासाचीच साक्ष देतात.
कैक रहस्य या इमारतींनी आपल्यात दडवून ठेवली असून, अशाच एका अद्वितीय वास्तूविषयीची माहिती पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधत आहे. ही ऐतिहासिक वास्तू आहे 'जल महल'. जयपूरची शान अशी ओळख असणारी ही महालवजा इमारत जयपुर-आमेर मार्गावर असणाऱ्या मानसागर तलावाच्या मध्यभाहगी असून, कैक रहस्य या इमारतीसह पाण्य़ात शांतपणे स्थिरावली आहेत. अनेक वर्षांपासून पाण्यात उभ्या असणाऱ्या या महालाचं कोणतंही नुकसान झालं नसून, 226 वर्षांपूर्वी नेमका हा महाल कसा बांधण्यात आला हाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
जल महलची उभारणी सवाई जयसिंह यांनी1799 मध्ये केली होती. या महालाच्या बांधणीआधी त्यांनी जयपूरच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी म्हणून गर्भावती नदीवर बांध बांधून मानसागर तलावाची निर्मिती केली. या महालाच्या बांधणीमागचा हेतूसुद्धा खास होता.
राजे त्यांच्या राणीसह खास क्षण व्यतीत करू इच्छित होते. ज्यासाठी त्यांनी तलावाच्या मध्यभागी हा महाल उभारला. राण्यांच्या विशेष न्हाणीघरासाठी हा महाल उभारला गेला असंही म्हटलं जातं. ही तिच जागा आहे जिथं राजा आणि राणी त्यांच्या नात्यातील खास क्षण व्यतीत करत.
अश्वमेध यज्ञानंतर आपल्या राणीसह तलावात स्नानाचा आनंद घेता येईल यासाठी हा महाल राजाच्या दृष्टीनं महत्त्वाचा होता. या बहुमजली महालाचे चार मजले पाण्याखाली असल्याचं सांगितलं जातं. महालाचा फक्त एकच मजला पाण्यावर असून, तिथं उष्णतेचा लवलेषही जाणवत नाही.
आजुबाजूला दिसणारे डोंगर आणि तलाव या महालाच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. पौर्णिमेच्या रात्रीसुद्धा या महालाच्या सौंदर्यात भर पडते. महालाचे चार मजले पाण्याखाली असले तरीही या वास्तूला अद्याप कोणतीही इजा पोहोचलेली नाही.
पाण्याखाली महालाचा पाया नेमका कसा रचला गेला या प्रश्नाचं उत्तर आजही मिळू शकलेलं नाही. असं म्हणतात की लाल बलुआ खडकापासून हा महाल तयार करण्यात आला असून, आजही त्याचं सौंदर्य अबाधित आहे. महालाच्या वरच्या बाजूल एक नर्सरी असून, इथं 1 लाखांहून अधिक झाडं असल्याचं सांगितलं जातं.