Kailash Mansarovar Yatra 2025: अनेकांसाठी भक्तिचा महासागर असणाऱ्या कैलास पर्वसासमवेत मानसरोवर यात्रेसंदर्भातील महत्त्वाची माहिती, खर्च आणि यात्रेदरम्यान उदभवणारी आव्हानं... सर्व माहिती.
30 जून 2025 रोजी कैलास मानसरोवर ही बहुप्रतिक्षित यात्रा सुरू झाली असून ऑगस्ट 2025 मध्ये या यात्रेची सांगता होणार आहे. तब्बल 6 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ही यात्रा सुरू झाल्यानं सध्या भाविकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
कैलास मानसरोवर यात्रा फक्त हिंदूच नव्हे, तर जैन, बौद्ध आणि शीख धर्मियांसाठीसुद्धा एक पूजनीय तीर्थस्थळ असून यंदाच्या वर्षी 750 भाविकांना या यात्रेसाठीची परवानगी मिळाली आहे. भारतातून या यात्रेची वाट सिक्कीममधून जाते.
यात्रेचा पहिला मार्ग लिपुलेख आणि दुसरा मार्ग सिक्कीमच्या नाथुला पास इथून जातो. सिक्कीमहून जाणारे भाविक कैलास मानसरोवर भवनहून बसनं दिल्ली विमानतळावर जातात आणि तिथून गंगटोक गाठल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास सुरू होतो. तर, लिपुलेखमार्गानं जाणारे प्रवासी बसनं उत्तराखंडला पोहोचतात आणि तिथून त्यांचा प्रवास सुरू होतो.
समुद्रसपाटीपासून साधारण 6,638 मीटर इतक्या उंचीवर असणाऱ्या कैलास पर्वताच्या कैक रहस्य़ांचा उलगडा आजवर होऊ शकलेला नाही. याच रहस्यमयी आणि तितक्याच पवित्र अशा पर्वताच्या अगदी नजीक जात एका अविस्मरणीय अनुभवासाठी यंदाच्या वर्षी भाविक या यात्रामार्गानं प्रवास करतील.
कैलास मानसरोवर यात्रेसाठी शारीरिक सुदृढता महत्त्वाची असून, यात्रेकरुंना 4 ते 5 दिवसांमध्ये कैलास मानसरोवर भवन इथं थांबावं लागतं. इथून त्यांना दिल्लीस्थित हार्ट एंड लंग्स इंस्टिट्यूट इथं नेण्यात येतं. ज्या व्यक्ती सुदृढ ठरतात त्यांनाच यात्रेसाठीची परवानगी दिली जाते. अतिशय थंड आणि साधारण 19500 फूट इतक्या उंचीवर ट्रेकिंग करण्यासाठी भाविकांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम राहावं लागतं.
खर्चाचा मुद्दा विचारात घ्यायचा झाल्यास साधारण माणसी 2 ते 3 लाखांचा खर्च येतो. शारीरिक चाचणी, चीनचा व्हिसा, इमिग्रेशन फी, घोड्यांचं भाडं, भोजन, सामान वाहण्याची क्षमता, कैलास मानसरोवर मंदिरासाठीची प्रवेश फी, तिबेटमध्ये राहण्यासाठीचा खर्च याचा समावेश असतो. याशिवाय तिबेटमध्ये खाण्य़ापासून, कपडे, फूड स्टोअर, ग्रुप अॅक्टीव्हिटी आणि इतर खर्चांचाही समावेश असतो.
कैलास मानसरोवर यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्यापासूनची प्रक्रिया पासपोर्ट, फोटो आणि तत्सम माहितीवर येऊन थांबते.
ही यात्रा पूर्ण करण्यासाठी 22 दिवसांचा कालावधी लागतो. ज्यामध्ये 14 दिवस भारतात आणि 8 दिवस तिबेटमध्ये जातात. या यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या संपूर्ण सुरक्षिततेची जबाबदारी भारत तिबेट सीमा पोलीस अर्थात ITBP वर असते.