Why Pur is Written in the Name of Cities: सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, श्रीरामपूर, गांगापूर... तुम्ही अशा अनेक शहरांच्या नावांच्या शेवटी 'पूर' जोडल्याचं पाहिलं असेल. पण काही शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' का जोडलं जातं याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? याचबद्दल...
महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्येही 'पूर'ने शेवट होणारी अनेक शहरं आणि जागा आहेत. जाणून घ्या नेमकं शहरांच्या नावानंतर 'पूर' का लावलं जातं.
भारत हा श्रेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सातवा सर्वात मोठा देश आहे. सध्या भारतामध्ये 28 राज्ये आणि 8 केंद्रशाशित प्रदेश आहेत.
भारतामध्ये एकूण 797 जिल्हे असून यापैकी 752 जिल्हे हे राज्यांमध्ये आहेत तर उरलेले 45 जिल्हे केंद्रशाशित प्रदेशांचा भाग आहेत.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी शहरं आहेत. प्रत्येक शहराची आपली ओळख आणि संस्कृती असून त्यांना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. भारतामधील जवळपास प्रत्येक मोठ्या शहराला संपन्न इतिहास असून बऱ्याच शहरांच्या नावाचं मूळही त्यांच्या इतिहासामध्येच सापडतं.
भारताच्या कानाकोपऱ्यात असलेल्या अनेक शहरं आणि गावांच्या नावाकडे नीट पाहिल्यास अनेकांच्या शेवटी 'पूर' जोडलेलं दिसून येतं.
अगदी उदाहरण द्यायचं झालं तर जयपूर, उदयपूर, रायपूर, सहारनपूर, मुबारखपूर, सुल्तानपूर, गोरखपूर, जैनपूर, कानपूर, रामपूर यासारख्या शहरांची नावं घेता येतील.
महाराष्ट्रामध्येही कोल्हापूर, नागपूर, श्रीरामपूर, गांगापूर, सोलापूर, तुळजापूर अशी उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रामध्येही पाहायला मिळतात. मात्र अनेक शहरं, गावांच्या नावांमध्ये 'पूर' का जोडलं जातं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
आज आपण शहरांच्या नावाच्या पुढे 'पूर' का लावलं जातं याबद्दलची माहिती आणि रंजक इतिहास जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात यामागील नेमकी कारणं आणि इतिहास...
पुरातनकाळापासून शहरांच्या नावापुढे 'पूर' जोडलं जातं. पुरातनकाळामध्ये अनेक राजे आणि प्रशासक त्यांच्या नावापुढे 'पूर' हा प्रत्यय लावायचे. त्यामधूनच या शहरांच्या नावांचा जन्म झाला असं म्हणता येईल.
उदाहरण सांगायचं झालं तर जयपूर शहराची निर्मिती राजा जय सिंह यांनी उभारलं. त्यामुळे त्यांनी आपल्या नावापुढे 'पूर' लावून त्यामधूनच 'जयपूर' असं या शहराचं नाव ठेवलं. पण 'पूर' या शब्दाचा अर्थ काय?
आता शहरांच्या नावानंतर 'पूर' लावलं जातं हे तर समजलं. पण 'पूर'चा अर्थ काय? तर 'पूर'चा उल्लेख ऋगवेदात आढळून येतो. 'पूर' हा पुरातन संस्कृत शब्द आहे. या शब्दाचा अर्थ शहर किंवा किल्ला असा होतो. पूर्वीच्या राजे-महाराजांचे सम्राज्य वेगवेगळ्या शहरांमध्ये पसरलेलं असायचं.
त्यामुळेच तेव्हाच्या राजांनी शहरांच्या नावांमध्ये एकसंघता येण्यासाठी आपल्या नावापुढे किंवा एखाद्या खास नावापुढे 'पूर' जोडून त्यावरुन शहरांना नावं देण्यास सुरुवात केली.
त्यामुळेच विशेष नावाच्या पुढे 'पूर' लावून शहरांना नावं दिल्यास इतर प्रांतांमधील लोकांना हे शहर किंवा प्रांत हा एखाद्या राजा-महाराजाच्या मालकीचा असल्याचं समजायचं. 'पूर' लावलेल्या नावांच्या शहरांवर कोणाची तरी मोठ्या व्यक्तीची सत्ता आहे हे सुद्धा या नावांमधून अधोरेखित व्हायचं.