Maharashtra NCP Crisis : ती 2019 ची पहाट...जेव्हा महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांकडे जाऊन शपथ घेतली होती. त्यापूर्वी 2004 चा शपथविधी..त्यानंतर अजित पवार काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाराज झाले होते. आजही ती नाराजी मनात धुमसतेय?
भाजपने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला धक्का दिल्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पक्षाला सुरुंग लावण्याचा तयारी आहेत. भाजपचे रणनीतीकार प्लॅन बी तयार करत आहेत, असं बोललं जातं आहे.
अजित पवार काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंडखोरी करणार का? हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहिला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचा वाद काही नवीन नाही. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. खास करुन जेव्हा फेब्रुवारी महिन्यात अजित पवार यांनी आपल्या मनातील वेदना बोलून दाखवल्या होत्या.
2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तरीदेखील पक्षाने मुख्यमंत्रिपदाची उत्तम संधी गमावली होती. त्यावेळी अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, ''2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही सर्वात मोठी चूक होती. कुणालाही मुख्यमंत्री केलं असतं तरी कामं झालं असतं.'
2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 71 तर काँग्रेसला 69 जागा मिळल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार राष्ट्रवादी होता. पण शरद पवारांनी ही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं. त्याऐवजी राष्ट्रवादीला दोन कॅबिनेट पद आणि एक अतिरिक्त राज्यमंत्री पद मिळालं होतं.
त्यानंतर पवार काका पुतण्यात गटबाजी सुरु झाली. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीच्या वेळी तिकीट वाटपावरुन पुन्हा काका पुतण्यात वाद झाले होते.
मग 2008 मध्ये छगन भुजबळ यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आणि अजितदादा पुन्हा नाराज झाले. पुढे 2010 मध्ये आदर्श घोटाळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव आलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.
मग 2012 मध्ये सिंचन घोटाळ्या आरोपांनी अजित पवारांची झोप उडवली. हे प्रकरण त्यावेळी खूप गाजलं. त्यावेळी अजित पवारांनी राजीनामा दिला होता.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थ पवार यांना राष्ट्रवादी पक्षाने हवा तसा पाठिंबा दिल्या नव्हता. यामुळे अजित पवारांच्या मनातील रागात अजून भर पडली. त्यावेळी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबद्दल शरद पवार यांचा विरोध होता, अशा बातम्याही आल्या होत्या. तेव्हाही अजित पवार आणि शरद वार यांच्यातील मतभेद कायम दिसून आलेत.
अजित पवार यांच्या मनात आजही काका शरद पवार यांच्याबद्दल नाराजी कायम आहे का? या नाराजीमुळे ते पक्षाला रामराम ठोकतील का? हे वेळच सांगेल.