had School : नावापुरता स्मार्ट स्कूल; लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारं वास्तव.... गावखेड्यांमधील शाळांची काय प...
तुपार तपासे आणि प्रताप नाईक, झी मीडिया (सातारा, कोल्हापूर): प्रगतीपथावर महाराष्ट्र माझा असं म्हणत ज्या राज्याच्या प्रगतीशील वाटेविषयी लोकप्रतिनीधी चर्चा करत आहेत. पण, याच महाराष्ट्राचं भविष्य असणारी पुढची पिढी सध्या ज्या अवस्थेत शिक्षणाचे धडे गिरवतेय ते पाहता राहून राहून 'कसा प्रगती करेल महाराष्ट्र माझा?' हाच उद्विग्न प्रश्न उपस्थित राहत आहे.
सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक शाळांची प्रचंड दूरवस्था झालीये. हामदाबाजमधील शाळेला तडे गेल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ आलीय. तसंच अनेक वर्ष पत्रे न बदलल्याने यातून पावसाचं पाणी शाळेमध्ये गळतंय. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी गळत नाही अशी जागा शोधून विद्यार्थ्यांना वर्गासाठी बसावं लागतंय.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी अनेक प्राथमिक शाळांना स्मार्ट स्कूल केलं, मात्र तरीही काही शाळांना दुरुस्तीसाठीचा निधीही मिळाला नसल्याने या शाळांची दूरवस्था झाली आहे.
तिथं कोल्हापूरात परिस्थिती वेगळी नही. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल 392 वर्ग खोल्या धोकादायक असल्याचं धक्कादायक चित्रं समोर आलं आहे.
एकीकडे सरकारच्या वतीने विकासाच्या गप्पा मारल्या जातात, पण दुसरीकडे मात्र हे भीषण वास्तव सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागात जिल्हा परिषद शाळांव्यतिरिक्त शिक्षणासाठी दुसरा पर्याय नाही.
असं असतानादेखील ग्रामीण भागात अजूनही अनेक वर्ग खोल्या धोकादायक आहेत, तर काही ठिकाणी वर्ग खोल्या पडक्या आहेत. जिल्हयातील कांडगाव विद्यामंदिर मध्ये पुरेसे वर्ग असले तरी काही वर्षे वापरात असणारी वर्ग खोली पडली आहे त्याच्या डागजुगीचं काम अद्याप झालेलं नाही.
तिथं हिंगोलीतल्या झेडपीच्या ब्रम्हपुरीतील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांनाही तडे गेले आहेत. काही खोल्यांना गळती लागलीय. त्यामुळे पाचवी पर्यंतच्या शाळेत विद्यार्थ्यांना गळक्या खोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.
ब्रह्मपुरीमध्ये झेडपीच्या शाळेत 70 विद्यार्थी शिक्षण घेतायेत. मात्र, दोनच वर्ग खोल्या असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होतेय. गावक-यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्याध्यापकांचे कार्यालय तात्पुरतं मोकळे करून विद्यार्थ्यांना तीन खोल्या उपलब्ध करून दिल्यायत. मात्र, खोल्या गळत असल्याने पाण्यासाठी भांडी लावण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलीय. त्यामुळे मंत्रिमहोदय यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.