Mahashivratri 2024 : दर 12 वर्षांनी या शिवमंदिरावर वीज पडून खंडीत होतं शिवलिंग; पुन्हा एकसंध होण्यामागचं रहस्य आजही उलगडललं नाही. कुठंय हे ठिकाण?
Mahashivratri 2024 Secrets of Bijli Mahadev Temple : भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये शंकराची अनेक मंदिरं आहेत. 12 ज्योतिर्लिंग म्हणू नका किंवा मग, चारधाम तीर्थ म्हणू नका. प्रत्येक ठिकाणाचं आणि प्रत्येक मंदिराचं वेगळेपण आहे. तिथं प्रचलित असणाऱ्या अनेक दंतकथा आहेत, ज्या कायमच भाविकांना भारावून सोडतात. अशा या भारत देशातील हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये वसलंय शंकराचं रहस्यमयी मंदिर.
हिमाचलमध्ये शंकराची कैक मंदिरं असून, प्रत्येक मंदिर वेगळीच अनुभूती देणारं आहे. अशा या मंदिरांपैकीच एक म्हणजे बिजली महादेव. हिमाचलमधील कुल्लू भागात हे मंदिर उभं आहे. निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या या मंदिराला पाहताच अनेकांच्या मनातील कालवाकालव शमते. बियास आणि पार्वती अशा नद्यांच्या संगमापाशीच हे मंदिर एका लहानशा टेकडीवर उभं आहे. असं म्हटलं जातं की दर 12 वर्षांनी या मंदिरावर वीज कोसळते आणि त्यामुळं मंदिराती शिवलिंग खंडित होतं.
मंदिरात असणारं शिवलिंग खंडित होतं आणि मग? असा प्रश्न अनेकांनाच पडतो. पण, या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच या मंदिराचं रहस्य आहे. असं म्हणतात की, शिवलिंग खंडित झाल्यानंतर पुजारी ते लोण्यानं जोडतात आणि ते पुन्हा पूर्वीचं रुप धारण करतं. लोणी, तुपानं जोडून पुन्हा पूर्वरुप धारण करण्याची धारणा असल्यामुळं या मंदिराला किंवा या शिवलिंगाला मक्खन महादेव असंही स्थानिकांडून संबोधलं जातं.
अशी आख्यायिका सांगितली जाते की, हिमाचल प्रदेशातील या भागात कुलांत नावाचा एक दैत्य राहत होता. हा दैत्य कुल्लीनजीक असणाऱ्या नागणधारहून अजगराच्या रुपात मंडी येथील घोग्घरधारहून लाहौल स्पिती ओलांडून मथाण गावी पोहोचला होता.
हा दैत्यरुपी अजगर बियास नदीचं पाणी रोखून धरत हा भाग बुडवू इच्छित होता. अनेक प्रयत्नांनंतर भगवान शंकरानं या दैत्याचा विश्वास जिंकला आणि त्याला तुझ्या शेपटीला आग लागल्याचं सांगितलं. शिवशंकराचे हे उद्गार ऐकताच कुलांतक अजगर मागे वळला आणि शंकरानं त्रिशुळानं त्याच्यावर वार केला.
शंकराकडून वध झाल्यानंतर या अजगराच्या शरीराचा एक भाग पर्वतामध्ये परावर्तित झाला. ज्यानंतर शंकरानं इंद्रदेवाला या दैत्याच्या शरीरावर अर्थात या भागावर 12 वर्षांतून एकदा वीज पाडण्यास सांगितलं.
मुख्य म्हणजे शंकराचं इंद्रदेवाला हे सांगणं असलं तरीही वीज पडल्यानंतर इथं असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला त्यामुळं नुकसान पोहोचू नये यासाठी खुद्द शिवशंकर स्वत:वर वीज पाडून घेतात अशी स्थानिकांची धारणा आहे.