Monsoon Trekking : भटकंतीविषयी बोलताना 'आम्ही महाराष्ट्र पिंजून काढलाय...' अशी ओळख सांगता? गुगलची मदत न घेता आता द्या, या प्रश्नाचं उत्तर...
Monsoon Trekking : विषय पावसाळी सहली किंवा ट्रेकला निघालाच आहे, तर एका अशा किल्ल्याची माहिती तुम्हाला असायलाच हवी, ज्याच्या तटबंदी आजही जैसेथे असून, त्या ऋतूचक्राच्या माऱ्यातही पाय घट्ट रोवून उभ्या आहेत. निसर्गाच्या अगाध लीलांमध्येही हा किल्ला त्याचं वैविध्य अद्यापही जपून आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हा किल्ला उशिरानं समाविष्ट झाला असला तरीही, त्याचा उल्लेख केल्यावाचून महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचा इतिहास पूर्णच होत नाही. लक्षात येतंय का या किल्ल्याचं नाव?
महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा भक्कम इतिहास लाभला असून, याच कणखर महाराष्ट्राच्या इतिहासात बांधण्यात आलेला सर्वात शेवटा किल्ला म्हणून ज्या किल्ल्याची ओळख आहे, त्याचं नाव मल्हारगड.
पुण्यातील वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या भुलेश्वर पर्वतरांगेचे दोन फाटे फुटतात. त्यापैकी एका दिशेला राजगड आणि तोरणा हे किल्ले आहेत. तर, दुसरीकडे आहेत वज्रगड, पुरंदर, मल्हारगड आणि सिंहगड. असं म्हणतात की पुण्यातून सासवडच्या दिशेनं जाणाऱ्या दिवेघाटावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता.
साधारण 1757 ते 1760 दरम्यान या किल्लाचं बांधकाम झाल्याचे संदर्भ आढळतात. किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सोनेरी गावामुळं त्याला 'सोनेरी गड' असंही म्हणतात. पेशव्यांचे सरदार आणि तोफखान्याचे प्रमुख पानसे यांनी या किल्ल्याची बांधणी केली असून, 1771 - 72 च्या सुमारास थोरले माधवराव पेशवे यांनी या किल्ल्याला भेट दिल्याचे संदर्भही ऐतिहासिक नोंदींमध्ये आढळतात. इंग्रजांविरोधातील बंडात वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक यांनीही किल्ल्यात आश्रय घेतल्याचं म्हटलं जातं.
मल्हारगडाचा आकार अतिशय कमाल असून, तो त्रिकोणाशी मिळताजुळता आहे. आकारानं लहान असला तरीही या किल्ल्याची भक्कम बाजू नाकारता येत नाही. मल्हारगड पाहण्यासाठी मुंबई- पुण्याहून एका दिवसात सहज प्रवास करता येतो. इथं मुख्य गड, पानसे गढी, लक्ष्मी नारायणाचं मंदिर अशी ठिकाणं पाहण्याजोगी आहेत.
मुंबई आणि पुण्याहून मल्हारगडला सहज पोहोचता येऊ शकतं. इथं जाण्यासाठी दोन वाटा असून, एक वाट सासवडहून निघते, तर दुसरी वाट झेंडेवाडीतून निघते. सासवडपासून सोनेरी हे गाव 6 किलोमीटर अंतरावर असून, तिथून पायथ्यावरून काही अंतरावर मल्हारगड दृष्टीक्षेपात येतो.
पुण्यातून सासवडला येताना दिवेघाटानंतर लगेचच 2 किमी अंतरावर झेंडेवाडीचा फाटा येतो. झेंडूची शेती असणारं हे गाव ओलांडून समोर दिसणाऱ्या डोंगररांगेतील खिंडीमध्ये यावं लागतं, या खिंडीत पोहोचल्यावर मल्हारगड नजरेस पडतो. गडावरील मंदिर वगळता इतर कुठंही राहण्याची सोय नाही. मंदिरातही 5 ते 6 लोकांनाच वास्तव्य करता येऊ शकतं. पण, याची परवानगी अनेकदा मिळत नाही. त्यामुळं अनेक फिरस्ते एका दिवसातच मल्हारगडाचं दर्शन घेऊन तिथून परतीची वाट धरतात.