Rajasthan tourism : देशाच्या इतरही राज्यांमध्ये आता हिवाळा खऱ्या अर्थानं सुरु झाला असून, राजस्थानही याला अपवाद नाही.
रणरणत्या वाळवंटासाठी ओळखल्या जाणाऱ्या याच राजस्थानात एक असंही ठिकाण आहे, जिथं चक्क थंडीमुळं पाणी गोठण्यास सुरुवात झाली आहे.
अनेक पर्यटकांच्या विशलिस्टवर असणारं राजस्थानातील हे गिरीस्थान म्हणजे माऊंट आबू. मागील पाच दिवसांपासून इथं सातत्यानं निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. (mount abu temperature)
रविवारमागोमाग सोमवारीसुद्धा माऊंट आबूमध्ये किमान तापमानाची नोंद करण्यात आली. यावेळी तापमान 0.0 अंशांवर होता.
इथं तापमानात झालेली घट पाहता बऱ्याच भागांमध्ये पाणीही गोठण्यास सुरुवात झाली आहे. माऊंट आबूमध्ये पडलेल्या या थंडीचा परिणाम येथील व्यवसायावरही होताना दिसत आहे.
माऊंट आबूमध्ये स्थानिक आणि पर्यटक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. तर, काही मंडळी चहा आणि गरम मसाले दूध यांसारख्या पेयांना प्राधान्य देताना दिसत आहेत.
आबूमध्ये तापमानानं निच्चांकी आकडा गाठल्यामुळं इथं मैदानी भागांमध्ये असणाऱ्या गवतावर असणारे दवबिंदूसुद्धा गोठण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नव्हे, तर वाहनाच्या काचांवरही बर्फाची पातळ चादर स्पष्टपणे पाहता येत आहे.
फक्त माऊंट आबू नव्हे, तर राजस्थानातील बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. जैसलमेरच्या (Jaisalmer) वाळवंटी भागामध्येसुद्धा रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे.