Mumbai Pollution : आता मुंबईतही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. ज्यामुळं यंत्रणांनीही चिंता व्यक्त केली आहे.
निरभ्र आकाश, शहरात गर्दी असली तरीही दूरवरची एखादी स्पष्ट दिसणारी आणि आपल्या स्वप्नांना खुणावणारी इमारत, सूर्यप्रकाशानं चमचमणारं आणि डोळ्यांना खुणावणारं समुद्राचं प्राणी हे असं चित्र आता दिसणं कठीण. कारण ठरतंय मुंबईतील वाढतं प्रदूषण.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणात सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळं शहरातील दृश्यमानताही बरीच कमी झाली आहे.
कुलाब्यापासून सांताक्रूझपर्यंत आणि उपनगरीय क्षेत्रांपर्यंत ही प्रदूषणाची लाट पसरल्याचं चित्र आहे. ऑक्टोबर हिटच्या उष्णतेचा तडाखा वाढत असतानाच आता खालावणारा हवेचा दर्जाही नागरिकांपुढं अडचणी निर्माण करताना दिसत आहे.
सध्याची परिस्थिथीच इतकी भीषण आहे, की आता मुंबईची हवा दिल्लीपेक्षा खराब असून, पालिकेकडून नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
फक्त मुख्य मुंबई शहरच नव्हे, तर ठाणे, नवी मुंबईतील हवाही खराब झाली असून, संपूर्ण मुंबई शहराचा श्वास कोंडल्याचं चित्र सध्या विचलित करत आहे.
मुंबईतील विलेपार्ले, चकाला परिसरातील हवेची स्थिती बुधवारी सायंकाळी अतिधोकादायक असल्याची नोंद करण्यात आली. हवेत स्थिरावलेले धुलीकण आणि धुकं यामुळे मुंबईत धुरकं पसरलं आहे.
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे विषाणूजन्य आजारांच्या पाश्र्वभूमीवर शहरातील नाहरिकांवर मास्क सक्ती लागू नसली तरीही त्यांना मास्क वापरत सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.