माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह बऱ्याच संतमंडळींच्या पालख्यांनी राज्या...
Ashadhi Ekasadhi : माऊलींच्या चरणी सुप्रिया सुळे नतमस्तक; डोक्यावर तुळस घेत वारीत सहभाग
टप्प्याटप्प्यानं या पालख्या आता पंढरपूरच्या दिशेनं पुढे जात असून, आता येणाऱ्या दर दिवसागणिक हा प्रवास आणखी रंगतदार होणार हे नाकारता येत नाही.
नुकताच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं दिवेघाट ओलांडला.
दरवर्षी पालखी दिवेघाटात पोहोचते तेव्हातेव्हा इथं प्रचंड गर्दी होते. मुंबई- पुण्याहून असंख्य मंडळी या पालखीचं दर्शन घेत वारीत सहभागी होण्यासाठी येतात.
अगदी राजकीय चेहरेसुद्धा यात मागे नाहीत. यंदाच्या वर्षीसुद्धा हेच चित्र पाहायला मिळालं जिथं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे वारीत सहभागी झाल्या.
दिवेघाट परिसरात सुप्रिया सुळे वारीत सहभागी होत माऊलींच्या चरण नतमस्तक झाल्या.
वारीत आलेल्या सानथोरांशी त्यांनी संवाद साधला, मोठ्या आपुलकीनं या मंडळींच्या साथीनं त्या वारील चालल्या.
यावेळी 'झी 24तास'शी संवाद साधताना त्यांनी माऊलींकडे नेमकं काय मागणं मागितलं हेसुद्धा सांगितलं.
'माऊली... यंदा चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे' अशी आर्जव त्यांनी केली.
वारीत चालत असताना त्यांनी निवडणुकांचा विषय निघताच 'रामकृष्ण हरी' अशा मोजक्या शब्दांत त्यांनी उत्तर दिलं.
राज्यातील राजकारण आणि तत्सम प्रश्नांना बगल देत सुप्रिया सुळे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता 'रामकृष्ण हरी' इतकंच म्हणणं योग्य समजलं.
थोडक्यात भक्तिच्या या महासागराला राजकारणाची किनार नको, असाच अविर्भाव त्यांच्या या वागण्यातून स्पष्ट झाला.
वारी प्रत्येकासाठी खास असते, सुप्रिया सुळे यासुद्धा याच वारीतल्या असंख्य विठ्ठलभक्तांपैकी एक असं म्हणायला हरकत नाही.