Raigad Khalapur Irshalwadi Landslide Today: बाजारपेठांपासून ते अनेक पूल आणि रस्त्यांपर्यंत सर्वकाही पाण्याखाली गेलं. निसर्गाचं हे रौद्र रुप अनेकांनाच चिंतेत टाकून गेलं.
आणखी चिंता वाढली ती म्हणजे बुधवारी रात्री उशिरानं घडलेल्या एका भीषण दुर्घटनेमुळं. जिथं रायगडच्या इरसालवाडी वर दरड कोसळली आणि 30 हून अधिक घरं दरडीखाली अडकल्याची माहिती मिळाली.
रात्रीच्या अंधारात मोबाईवर गेम खेळणाऱ्या काही तरुणांच्या समयसूचकतेमुळं या घटनेची माहिती डोंगराळ भागापासून प्रशासनापर्यंत पोहोचण्याचत मदत झाली.
तातडीनं सूत्र हलली आणि बचाव कार्य सुरुही झालं. पण, रात्रीच्या अंधारात पावसाचाही जोर वाढत असल्यांमुळ अडचणींचाही सामना करावा लागला. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांसह राज्याच्या इतर मंत्र्यांनीही इरसालवाडी गाठली.
गुरुवारची सकाळ उजाडली तेव्हा इरसालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या या वाडीचं उध्वस्त झालेलं रुप समोर आलं. ढिगाऱ्याखाली अडकलेले संसार स्पष्ट दिसत होते.
मुख्य म्हणजे दरड कोसळली तेव्हा तिथं किती गावकरी होते, घराबाहेर नेमके कितीजण होते याबाबतची महिती समोर आली नसल्यामुळं बचावकार्य करणाऱ्या पथकांसमोर हे मोठं आवाहन आहे.
कुठे घराची लाकडं, पत्रे, कपडे अडकले होते तर कुठे कोलमडलेले ओंडके आणि घराचे वासे दिसत होते. अतिशय भयाण अशी ही परिस्थिती पाहताना दरड कोसळल्यानंतरचा आक्रोश विचार करूनच काळजात घाव करणारा ठरला.
दरम्यान, सध्याच्या घडीला इरसालवाडीवर बचावकार्य वेगानं सुरु असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
आतापर्यंत पावसाच्या दिवसांमध्ये दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडतात. पण, उत्तर रायगडमध्ये इतकी भीषण घटना पहिल्यांदाच घडल्यामुळं राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.