Maharashtra Government PWD : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळात बदल्यांवरून आता काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काय आहेत हे आरोप? पाहा सविस्तर वृत्त.
ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई : (Maharashtra Government PWD) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळात आता बदल्यांवरून आरोप करण्यात आले आहेत. नियमानुसार बदलीला पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली न करता त्यांच्याकडे मलईदार टेबलची जबाबदारी अनेक वर्षांपासून सोपवण्यात आली आहे.
RTI कार्यकर्त्यांकडून धक्कादायक दावा करत यासंदर्भात काही गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 3 वर्षांनंतर कर्मचाऱ्यांची बदली करणं बंधनकारक असतानाही तो नियम सर्रासपणे धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप RTI कार्यकर्त्यांनी केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग हा राज्य सरकारचा एक महत्त्वाचा विभाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे वर्षानुवर्ष बदलीच न होणं यामागे इथलं अर्थकारण आहे का असा प्रश्न आता सातत्यानं विचारला जात आहे.
बदलीचा कायदा धाब्यावर बसवून लिपिक, वरिष्ठ लिपिक, रोखपाल या आणि इतर पदांवर वर्षानुवर्षं बसलेल्या कर्मचाऱ्यांवरच आरटीआयचा रोख आहे.
इथं वरिष्ठ लिपिक पदावरील कर्मचाऱ्याची कार्यालयातील संख्या अपुरी असल्यानं बदल करण्यात आली नसल्याचं कारण समोर आलं आहे.
तर आणखी एका वरिष्ठ लिपिकपदी कामाचा अनुभव पाहता मुदतवाढ देण्याची शिफारस आणि कोणतीही तक्रार नसल्यानं बदली नसल्याचं कारण समोर आलं आहे.
अधिक्षकपदी असणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्याची विभागाला आवश्यकता असल्यानं त्यांची बदली झालेली नाही असं कारण समोर आलं आहे.
तर काही विभागांमधील कर्मचारी बदलीसाठी पात्र नसल्यानं, कार्यालयाच्या निविदा शाखेच्या कामात आवश्यकता असल्यानं आणि कर्मचाऱ्यांची तक्रार नसल्यानं बदली करण्यात आली नसल्याची बाब समोर आली.