Same Sex Marriage : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं अनेकांचाच हिरमोड केला खरा. पण, त्यातही काही जोडप्यांनी मात्र एका सकारात्मक संदेशासह हा लढा सुरुच ठेवणार अशी शपथ घेतली.
भारतात सर्वोच्च न्यायालयानं आजपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. काही निर्णयांनी अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि काहींचा भ्रमनिरासही झाला.
याच सर्वोच्च न्यायालयानं समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नाकारली. ज्यानंतर या निकालावर संमिश्र प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या.
या सर्व प्रतिक्रियांमध्ये एका समलैंगिक जोडप्यानं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या. कारण, अनन्य कोटिया आणि वकील उत्कर्ष सक्सेना या गे जोडप्यानं सर्वोच्च न्यायालयासमोरच एकमेकांना अंगठी घालत engagement केली.
अनन्य कोटियानं सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहिलं, 'ज्या कोर्टानं आमचे हक्क नाकारले तिथंच जाऊन आम्ही अंगठ्या बदलल्या. त्यामुळं हा आठवडा कायदेशीर नुकसानाचा नव्हे, तर आमच्या engagement चाच होता.'
उत्कर्ष सक्सेना या तरुण वकिलानंही त्याच्या सोशल मीडिया पेजवरून engagement चाच एक फोटो शेअर केला. जिथं त्यानं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मन दुखावणारा होता असं स्पष्ट लिहिलं.
आम्ही लग्नाच्या समान हक्कांसाठी एक दिवस पुन्हा सर्वोच्च न्यायालयात लढा देण्यासाठी उभे राहू असं म्हणत त्यानं आणि अनन्यनं एका नव्या प्रवासाची सुरुवात केली.
सोशल मीडियावर एकिकडे सर्वोच्च न्यायालयाची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे मात्र या जोडीच्या निर्णयाचं अनेकांनीच कौतुक करत त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या.