निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेची मने जिंकण्यासाठी शिंदे सरकार तयार आहे. यासाठी राज्यातील जनतेवर योजनांचा पाऊस पाडण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होणार आहे.
Shinde Guarantee:दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन, पुणे पोर्शे कार प्रकरण विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आणि सत्ताधाऱ्यांचे उत्तर अशा विविध घटनांनी पावसाळी अधिवेशन चांगलंच रंगलंय. उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार राज्यातील अर्थसंकल्प सादर करतील. असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मजबूत पकड या अर्थसंकल्पावर असेल असे म्हटले जात आहे. यामागचे कारणंही तसेच आहे.
देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असा नारा आपण मागच्या विधानसभा निवडणुकीत ऐकला असेल. यावेळेस मोदीकी गॅरंटीचा नारा देशभरात चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसमान्यांसाठी आणलेल्या योजनांना मोदींची गॅंरटी असे म्हटले जाते. दरम्यान देशातील मोदींची गॅरंटीप्रमाणे राज्यात शिंदेंची गॅरंटीची चर्चा घडवून आणली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती सरकार पुन्हा सज्ज झाले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेची मने जिंकण्यासाठी शिंदे सरकार तयार आहे. यासाठी राज्यातील जनतेवर योजनांचा पाऊस पाडण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील अर्थ संकल्पात सर्वसामान्य जनतेसाठी विशेष योजनांचे प्लानिंग करण्यात आले आहे. या योजना समोर आल्यावर शिंदेची गॅरंटी राज्यभरात पोहोचवली जाणार आहे. काय आहे शिंदेंची गॅरंटी? याचा सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम होईल? आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला याचा कितपत होईल? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान या योजनांबद्दल जाणून घेऊया.
मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्रातही तशी योजना आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असे या योजनेचे नाव असेल. महिलांचे आर्थिक, सामाजिक स्थैर्य आणि जीवनमान सुधारावे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
वार्षिक उत्पन्न 2 लाख 60 हजार पेक्षा कमी असलेल्या महिलांना याचा फायदा घेता येणार आहे. राज्यातील साधारण साडेतीन कोटींहून अधीक महिलांपर्यंत ही योजना पोहोचवली जाणार आहे. यातील प्रत्येक लाभार्थी महिलेला 1600 रुपये मिळणार आहेत.
महिलांसोबतच राज्यातील युवकांसाठी आकर्षक योजना आणण्यात येत आहे. मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना असे याचे नाव असून याअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे.
मुख्यमंत्री युवा कौशल्य योजने अंतर्गत बारावी उत्तीर्ण उमेदवारांना वार्षिक 6 ते 7 हजार रुपये दिले जाणार आहेत. आयटीआय डिप्लोमासाठी 7 ते 8 हजार रुपये तर पदवीधरांना 9 ते 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. 18 ते 29 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
शिंदे गॅरंटी अंतर्गत महिला, शेतकऱ्यांसाठी खास योजना आणण्यात आली आहे. अन्नपूर्णा योजने अंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी 3 घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. याआधी केंद्र सरकारच्या उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ही सुविधा मिळत आहे.
शेतकऱ्यांसाठी मुख्यंमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व छोट्या मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे. राज्यातील 45 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. एवढेच नव्हे तर 7 लाखाहून शेतकऱ्यांना सौर पंप देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. राज्यातील एकूण 50 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
आगामी विधानसभा निवडणूक महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढवली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या घोषणांचा मुद्दा महत्वाचा असेल. या योजना कागदावरुन प्रत्यक्ष जनतेपर्यंत कशा पोहोचतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.