Thane-Borivali twin tunnel: ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार होते, मात्र वनविभागाकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू होणारा हा प्रकल्प अद्याप सुरू होऊ शकला नाही.
Thane-Borivali Twin Tunnel: ठाणे-बोरिवली ट्विन टनलची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. अनेकदा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात या प्रकल्पाचा उल्लेख झाला आहे.
मराठी सेलिब्रिटीदेखील या टनलची जाहिरात करत घोडबंदरचे ट्रॅफिक कसे कमी होणार आहे? हे सांगताना दिसले. पण प्रत्यक्षात हे काम काही प्रत्यक्षात पूर्ण झालेले दिसले नाही. त्यामुळे सध्या हे काम कुठपर्यंत पोहोचले आहे? कशामुळे अडले आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
बोरिवली ते ठाणे दरम्यान सुमारे 5.75 किमी लांबीचा बोगदा आणि ठाणे ते बोरिवली दरम्यान सुमारे 6.1 किमी लांबीचा बोगदा असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाण्यातून बोरिवली अवघ्या 15 ते 20 मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन तास लागतात.
बोगदा बांधण्याची जबाबदारी मेघा इंजिनीअरिंग कंपनीकडे देण्यात आली आहे. प्रकल्पाच्या आरएमसी प्लांटसाठी बोरिवलीजवळील जमीन निवडण्यात आली आहे. मुंबईत 2 टनेल बोअरिंग मशीन आणण्याची तयारी सुरू असून संबंधित विभागाकडून परवानगी मिळताच दहा ते पंधरा दिवसांत बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
घोडबंदर रोड मुंबईला गुजरातशी जोडतो. गेल्या काही वर्षांत येथे झपाट्याने विकास झाला आहे. मोठ्या प्रमाणात निवासी इमारती बांधल्या जात आहेत. लोकसंख्या वाढल्याने येथील वाहनांची संख्याही झपाट्याने वाढली आहे.
त्यामुळे घोडबंदर रोडची वाहतूक समस्या अनेक पटींनी वाढली आहे. ठाणे ते बोरिवली हा नवीन मार्ग तयार झाल्याने घोडबंदर रोडची वाहतूक समस्या बऱ्याच अंशी कमी होण्याची शक्यता आहे.
ठाणे-बोरिवली ट्विन टनल संजय गांधी नॅशनल पार्कमधून जाणार आहे. पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुरू करण्यासाठी एमएमआरडीएला वनविभागाची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. नॅशनल पार्क अंतर्गत प्रत्येकी 3 लेनचे दोन बोगदे बांधले जाणार आहेत.
घोडबंदर रोडवरील वाहतूक समस्या सोडविण्याचा प्रकल्प वनविभागाकडून मंजुरी मिळण्यास दिरंगाईमुळे रखडला आहे. या प्रकल्पासाठी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया मे महिन्यातच पूर्ण झाली, मात्र मंजुरी मिळाल्याने ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
सुमारे 12 किमी. या प्रदीर्घ प्रकल्पासाठी सुमारे 16 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. निविदेतील अटींनुसार कंपनीला तीन वर्षांत काम पूर्ण करायचे आहे.
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार होते, मात्र वनविभागाकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू होणारा हा प्रकल्प अद्याप सुरू होऊ शकला नाही. आता एमएमआरच्या या महत्त्वाच्या प्रकल्पाचे बांधकाम कधी सुरू होणार, याचे उत्तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) नाही.