ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवे नियम आणत असते. रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय यूजर्ससाठी ट्रायने एक आनंदाची बातमी दिली आहे.
TRAI New Rules: देशात मोबाईल युजर्सची संख्या खूप मोठी आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यापासून कॅमेरा, ईमेल, टीव्ही सारख्या अनेक गोष्टी मोबाईलमुळे सहज शक्य झाल्या आहेत. काही समाजकंटकांकडून तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन मोबाईलच्या माध्यमातून फसवणूक केली जाते. काही कंपन्यादेखील प्रोडक्ट प्रमोशनसाठी वारंवार मोबाईल कॉल्स करतात, याचा अनुभव तुम्हाला आला असेल.
टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय या सर्वावर लक्ष ठेवून असते. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवे नियम आणत असते. रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय यूजर्ससाठी ट्रायने एक आनंदाची बातमी दिली आहे.
उद्यापासून म्हणजेच 11 डिसेंबर 2024 पासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) संदेश ट्रेसेबिलिटी नावाचा नवीन नियम लागू करत आहे.
तुमच्या मोबाईलवर येणारे स्पॅम मेसेज कमी करण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. हा नवीन नियम सुरुवातीला 1 डिसेंबरपासून लागू होणार होता. पण सेवा पुरवठादारांना तयारीसाठी थोडा अधिक वेळ देण्यासाठी तो पुढे ढकलण्यात आला. मुळात हा नियम 31 ऑक्टोबरपर्यंत लागू करायचा होता. पण टेलिकॉम कंपन्यांच्या विनंतीवरून तो 1 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला.
मोबाईल युजर्सना दररोज अनेक फसवे, स्पॅम मेसेज आणि कॉल्स येता. पण यांचा मूळ स्त्रोत शोधणे कठीण असते. यात बदल करण्यासाठी ट्रायने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
तुम्हाला आलेल्या स्पॅम मेसेजचा स्त्रोत शोधणे आता सोपे झाले आहे. यामुळे लोकांची फसवणूक होणार नाही. या नवीन प्रणालीमुळे मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीपासून ते पोहोचवणाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा शोध घेता येणार आहे.
स्पॅम मेसेज संदर्भात ट्रायने एक पारदर्शी प्रक्रिया तयार केली आहे. ज्यामध्ये टेलीमार्केटरसारखे लोक देखील सामील होतील. सेवा प्रदात्यापर्यंत मेसेज पोहोचण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
या नवीन नियमामुळे बँकिंग आणि इतर सेवांसाठी ओटीपीसारखे महत्त्वाचे मेसेज येण्यास उशीर होणार नाही याचीही काळजी ट्रायने घेतली आहे. हे महत्त्वाचे मेसेज वेळेवर पोहोचतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या नवीन नियमानुसार, नोंदणी नसलेले प्रमोशनल मेसेज आणि स्पॅम ब्लॉक केले जातील. यामुळे यूजर्सना जाहिराती आणि प्रचारात्मक मेसेज ओळखणे सोपे होईल.
यासाठी 27 हजारहून अधिक कंपन्यांनी आधीच नोंदणी केली असून प्रक्रिया वेगाने सुरू आहे. एकूणच काय तर नवीन नियमामुळे प्रत्येक मोबाईल युजरला आलेला मेसेज सुरक्षित आणि पारदर्शक असेल.