PHOTOS

फेक डिग्री, पहलगामनंतर भव्य दारु पार्टी अन्...; ठाकरेंच्या सेनेनं निशिकांत दुबेंच्या वादग्रस्त इतिहासाचा लेखाजोखाच मांडला

Controversial History of Nishikant Dubey: महाराष्ट्र अन् मराठीबद्दल वागद्रस्त विधानं करणाऱ्या भाजपा खासदाराचा इतिहास पाहिलात का? ठाकरेंच्या सेनेनं नेमकं काय काय म्हटलंय पाहूयात...

Advertisement
1/15

महाराष्ट्राविरुद्ध बोलणारे भाजपाचे खासदार निशिकांत दुबेंचा उद्धव ठाकरेंच्या पक्षाने जशात तशा शब्दांमध्ये समाचार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. निशिकांत दुबेंसंदर्भातील सर्व वादग्रस्त प्रकरणांबद्दल ठाकरेंनी खास आपल्या शैलीत भाष्य केलं आहे. नेमकी कोणती प्रकरणं ठाकरेंच्या पक्षाने समोर आणलीयेत पाहूयात... (सर्व फोटो - प्रातिनिधिक आहेत, सौजन्य - निशिकांत दुबे यांच्या फेसबुक पेजवरुन)

2/15

भारतीय जनता पार्टीचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबेंनी महाराष्ट्र आणि मराठीबद्दल केलेल्या बेताल विधानांवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दुबेंचा वादग्रस्त विधानांचा इतिहासच समोर आणला आहे. महाराष्ट्रातील लोक आमच्या पैशांवर जगतात म्हणणाऱ्या दुबेचा 'सामना'च्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. 

 

3/15

मराठी आणि हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये निशिकांत दुबेंनी, "तुम्ही कोणाच्या भाकरी खात आहात? तिथे टाटा-बिर्ला आहेत? तुम्ही आमच्या पैशावर जगता. तुम्ही किती टॅक्स भरता? तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत? आमच्याकडे खाणी आहेत, तुमच्याकडे खाणी आहेत का? सगळे उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. हिंदी भाषिकांना मारहाण करता मग इतर भाषिकांना का मारहाण करत नाहीत?" असा सवाल विचारला. 

 

4/15

"तुम्ही कोणाच्या भाकरी खात आहात? तिथे टाटा-बिर्ला, रिलायन्स आहेत? तुम्ही आमच्या पैशावर जगता. तुम्ही किती टॅक्स भरता? तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत? आमच्याकडे खाणी आहेत, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशाकडे आहेत खाणी! तुमच्याकडे खाणी आहेत का? सगळे उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. सेमी कंडक्टरचा उद्योग गुजरातमध्ये आहे. हिंदी भाषिकांना मारहाण करता मग इतर भाषिकांना का मारहाण करत नाहीत? ऊर्दू, तमिळी, तेलगु लोकांना मारहाण करा ना असा सवाल निशिकांत दुबे यांनी विचारला आहे. "स्वत:च्या घरात आहात तेव्हा मोठे बॉस आहात. या बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये या तिथे तुम्हाला आपटून आपटून मारु," अशी दर्पोक्ती दुबे यांनी केली.

 

5/15

"देशात मोदी काळ सुरू झाल्यापासून भाजपमध्ये अनेक टुकार लोकांना भाव मिळू लागला. ‘पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार’ अशी स्थिती सर्वच क्षेत्रांत झाली आहे. निशिकांत दुबे या व्यक्तीच्या गळ्यातही असाच मणिहार आहे. हे महाशय भारतीय जनता पक्षाचे खासदार असून त्यांनी आता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर, मराठी माणसावर गरळ ओकली आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं दुबेंवर निशाणा साधताना म्हटलं आहे.

 

6/15

"हे दुबे महाशय म्हणतात, ‘‘महाराष्ट्रात आता आहे काय? महाराष्ट्राचे वैभव संपले आहे. कोणता मोठा उद्योग महाराष्ट्रात आहे? आमच्या श्रीमंतीवर तुम्ही मराठी माणसे जगत आहात. महाराष्ट्राबाहेर आलात तर मराठी माणसांना आपटून आपटून मारू.’’ दुबेचे हे विधान महाराष्ट्राचा घोर अपमान करणारे आहे. मोदी-शहांच्या आशीर्वादाने हा दुबे अशी विधाने करतो व मोदींचे अभय असल्याने त्याला संरक्षण मिळते," असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

 

7/15

दुबेंसंदर्भातील वादांची यादीच ठाकरेंच्या शिवसेनेनं 'सामना'मधून वाचल्याचं दिसत आहे. "सर्वोच्च न्यायालयाला देशात अराजक माजवायचे आहे’’ असे वक्तव्य करून या माणसाने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला होता, पण मोदींचे अभय असल्याने तो तेथेदेखील सुटला," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय.

 

8/15

"दुबे याचे बनावट ‘एमबीए’ डिग्रीचे प्रकरण धक्कादायक आहे. आपण एमबीए असल्याचे त्याने संसदेच्या प्रतिज्ञापत्रात दाखवले. ही डिग्री दिल्ली विद्यापीठाची असल्याचे त्याने शपथेवर सांगितले, पण ही डिग्री खोटी, बनावट असल्याचे स्वतः दिल्ली विद्यापीठानेच स्पष्ट केल्यावर या माणसाला अटक करून त्याची चौकशी होणे गरजेचे होते. संसदेची फसवणूक केल्याबद्दल या दुबेचे संसद सदस्यत्व रद्द व्हायला हवे होते, पण संसदेची इतकी भयंकर फसवणूक करूनही नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी दुबेचा बचाव केला. कारण स्वतः पंतप्रधान मोदी यांच्या सर्व ‘डिग्य्रा’ बोगस, बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे ‘गुरू तैसा चेला’ असा हा सगळा मामला आहे," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

 

9/15

"कोण कुठला निशिकांत दुबे हा लोफर माणूस दिल्लीत बसून मराठी माणसाला अपमानित करतो आणि फडणवीसांचे कॅबिनेट षंढासारखे गप्प बसते. याचे रहस्य इतकेच की, या निशिकांत दुबेचे बोलवते धनी प्रत्यक्ष मोदी व शहा आहेत. त्यामुळे अर्ध्या दाढीवर हात फिरवणाऱ्यांची कढी पातळ झाली आहे,' असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

 

10/15

"मराठी माणूस जेव्हा त्याच्या हक्कांसाठी लढायला उतरतो तेव्हा इतर प्रांतांतील कावळे ‘काव काव’ करून मराठी माणसाला प्रांतीयवादी ठरवण्याचा प्रयत्न करतात. इतर सर्व प्रांतांनी आपापली भाषा, जमीनजुमला, अस्मिता यासाठी लढायचे, पण महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा आवाज उठवला की, कंगाल राज्यांचे कुणी टिनपाट ‘दुबे’ शिवरायांच्या राज्याविरुद्ध गरळ ओकतात. पुन्हा दुर्दैव हे की, ही गरळ सहन करणारे व त्या दुब्याविरोधात निषेधाचा ‘ब्र’ न काढणारे राज्यकर्ते महाराष्ट्राच्या गादीवर बसले आहेत," असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

 

11/15

"आज देशात जीएसटीच्या रूपाने सर्वाधिक ‘कर’ महाराष्ट्र देत आहे. सर्व हिंदी भाषिक राज्ये मिळून एकत्र केली तरी महाराष्ट्राच्या ‘जीएसटी’ कराचा जून 2025 चा आकडा (30 हजार 553 कोटी रुपये) त्यांच्यापेक्षा जास्त आहे. यातच कोण कोणाच्या मेहेरबानीवर जगतो त्याचा हिशेब स्पष्ट होतो. ब्रिटिशांना ‘चले जाव’ची धमकी देण्यासाठी महात्मा गांधी यांनी मुंबईचीच निवड का केली? याचा अभ्यास दुब्याठुब्यांनी करायला हवा," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

 

12/15

"कोरोना काळात उत्तर प्रदेशसह सर्वच राज्यांनी आपापल्या सीमा बंद करून आपल्याच लोकांना बाहेर ठेवले तेव्हा या सगळ्या हिंदी भाषिकांचा पालनहार महाराष्ट्रच होता. प्रयागराजच्या गंगेत हिंदी भाषिकांची प्रेते अनौरस म्हणून फेकली जात होती तेव्हा महाराष्ट्रात या सगळ्यांची ममतेने काळजी घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच होते. तेव्हा हा दुबे कोठे होता?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

13/15

"हाच तो दुबे जो पहलगाम हल्ल्यात 26 महिलांचे कुंकु पुसल्यावर कश्मीरात जाऊन ‘दारूबाज’ पार्टी पोलीस संरक्षणात करीत होता. भारतीय महिलांच्या कुंकवाचे रक्षण करण्यासाठी पहलगामला एकही पोलीस नव्हता, पण दुबेच्या भव्य दारू पार्टीच्या संरक्षणासाठी मोदी-शहांनी शेकडो पोलीस ठेवले होते. असा हा दुबे महाराष्ट्राला आपटून मारण्याची भाषा करतो हा विनोद म्हणावा लागेल," अशी टीका करण्यात आली आहे.

 

14/15

"निशिकांत डुबेने केलेली महाराष्ट्राला आपटण्याची भाषा ही नरेंद्र मोदी, अमित शहांचीच आहे. महाराष्ट्राविरुद्ध गरळ ओकण्यासाठी मोदी-शहांनी या दुबेचे थोबाड निवडले. दुबेचे थोबाड हे गटार आहे. या गटारातून सर्वोच्च न्यायालय, पहलगामचे निरपराध बळी यांच्याबाबतही सतत मैलाच बाहेर पडतो. या गटारास एकदा वरळीचे गटार दाखवावेच लागेल," असा उल्लेख अग्रलेखात आहे.

 

15/15

"राज्याराज्यांत, भाषाभाषांत भांडणे लावण्याची सुपारी आणि दलाली दुबेसारख्या लोकांनी घेतली असेल तर त्या सापळ्यात महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांनी अडकू नये. दुबेचा निषेध मुंबई व महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांनी करायलाच हवा," अशी अपेक्षा लेखाच्या शेवटी व्यक्त करण्यात आली आहे. (सर्व फोटो - प्रातिनिधिक आहेत, सौजन्य - निशिकांत दुबे यांच्या फेसबुक पेजवरुन)





Read More