अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. शेतकरी, महिला वर्ग, संरक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा यासारख्या विविध वर्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्या आहेत.
आज सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर त्याचा लोकांवर थेट परिणाम होणार का? याची लोकांमध्ये खूप उत्सुकता असते. या अर्थसंकल्पात काही गोष्टींवरील कर कमी झाल्याने त्याचा उत्पादनांच्या किंमतींवरही थेट परिणाम झाला आहे. त्यामुळं काही वस्तु महाग झाल्या आहेत तर काही वस्तु स्वस्त झाल्या आहेत. याचा आढावा घेऊया.
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. सरकारने मोठी घोषणा करत जनतेला मोबाईल फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क कमी केले आहे.
मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तुंवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरुन 10 टक्के करण्यात आले आहे. तसंच, कच्च्या मालावरील आयात शुल्कात पाच टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. आयात शुल्क कमी केल्याने त्याचा परिणाम मोबाईल फोनच्या किंमतीवर होणार आहे.
मोबाइल फोन व्यतिरिक्त या अर्थसंकल्पात काहीच स्वस्त वा काहीच महाग झालेले नाहीये.
यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्याच अशा घोषणा करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळं देशात काहीच महाग वा स्वस्त झालेले नाहीये.
1 जुलै 2017 साली जीएसटी सेवा कर लागू झाल्यानंतर अर्थसंकल्पात फक्त कस्टम ड्युटी, एक्साईज ड्युटी वाढवली किंवा कमी केल्यासच त्याचा वस्तुंवर परिणाम होतो. त्यानुसारच वस्तू स्वस्त व महाग होतात.
यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक्साईज ड्युटी किंवा कस्टम ड्युटीबाबत काहीच भाष्य केले नाहीये. त्यामुळं प्रत्यक्षात काहीच स्वस्त व महाग झालेले नाहीये.