लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत 30 जागांवर विजय मिळवलेला असतानाच आता भाजपाकडून महाविकास आघाडीवरील एकत...
महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने चांगलं यश संपादन केलं. महाविकास आघाडीने 30 जागा मिळवल्या. महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं. महायुतीमधील भारतीय जनता पार्टी, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यापैकी एकाही पक्षाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये निवडणुकांची घोषणा होईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच शनिवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पाडली.
या पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरेंबरोबरच काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.
याच पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी राज्यातील घडामोडींवर भाष्य करताना थेट महायुतीला मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासंदर्भात प्रश्न विचारला आहे.
महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नाही. ते मुख्यमंत्री कोणाला बनवणार अशापद्धतीची टीका भाजपाकडून तसेच महायुतीच्या घटक पक्षांकडून केली जाते. याच टीकेवरुन उद्धव ठाकरेंनी महायुतीला प्रश्न विचारला आहे.
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण आहे हे आधी भाजपाने जाहीर करावे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
आता फडणवीस यांची अवस्था काय झाली आहे? हे लोकसभा निवडणुकीत दिसलं. तिन्ही पक्ष ओसाडच आहेत, असा टोला ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावरुन महायुतीला लगावला.