Rohit Sharma, Virat Kohli Retirement : (Team India) भारतीय क्रिकेट संघ 20 जूनपासून इंग्लंड दौऱ्यासाठी जाणार असून, तिथं पाच कसोटी सामन्यांची मालिका संघ खेळणार आहे. साहेबांच्या या देशाच्या दौऱ्यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाची रचना पुरती बदललेली असणार आहे हेच आता स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मानं (Test Cricket) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आपण फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये संघाचं नेतृत्त्वं करणार असल्याचं जाहीर केलं.
रोहितच्या निवृत्तीची बातमी पचवणं क्रिकेटप्रेमींना अशक्य होत असतानाच त्यामागोगा आता आणखी एक अनपेक्षित वृत्त क्रिकेट जगताला हादरवून गेलं. ते म्हणजे अष्टपैलू खेळाडू विराट कोहलीची निवृत्ती. विराटनं इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आणि हा निर्णय सोपा नव्हता असंही पोस्टमध्ये लिहिलं. एका क्षणात त्याची ही पोस्ट वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाली आणि या दोन अनुभवी खेळांडूशिवाय परदेशी भूमीत त्यातही साहेबांच्या देशात भारतीय क्रिकेट संघ नेमका कोणत्या रणनितीनं खेळणार? हाच प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करून गेला.
(England Tour) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या संभाव्य यादीवर नजर टाकल्यास सुरु असणाऱ्या चर्चा आणि एकंदर वातावरण पाहता शुभमन गिलवर संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सोपवली जाऊ शकते. तर, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंवर संघाची धुरा असणार यात शंका नाही. तर, मोहम्मद शमीकडे गोलंदाजीची जबाबदारी सोपवत त्याच्या फिटनेसला अनुसरूनच यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल.
शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, केएल राहुल, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरैल, सरफराज खान, करुण नायर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा आणि आकाशदीप
जाणकारांच्या मते संघात केएल आणि यशस्वीची जागा कायम असून, त्यांच्यावरच संघाला स्थिर धावसंख्येची सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. तर, पंतवरही संघ बऱ्याचदृष्ट्या अवलंबून असेल. प्लेइंग इलेव्हनमध्ये सरफराज खान आणि ध्रुव जुरैल यांना जागा मिळू शकते असा अंदाज असला तरीही साई सुदर्शन आणि करुण नायर यांच्यासोबत आता निवड नेमकी कोणाची होते हे पाहणं महत्त्वाचं असेल.
इंग्लंडच्या या दौऱ्यासाठी संघात एमात्र फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजाला स्थान मिळूच शकतं. पण, इथंही अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या खेळाडूंची स्पर्धा नाकारता येत नाही. तर, जलदगती गोलंदाजीसाठी संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. तेव्हा आता अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर आणि अभिमन्यू ईस्वरन यांना संघात जागा मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. रोहित आणि विराटची अनुपस्थिती मात्र संघात सतत जाणवणार यात वाद नाही. कसोटी क्रिकेटमधील विराट आणि रोहितचा अनुभव आणि या दोन्ही खेळाडूंचं संघातील स्थान पाहता त्यांच्याशिवाय हा संघ परदेशात नेमकी कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.