IPL 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात असल्याने खबरदारी म्हणून बीसीसीआयकडून आयपीएल 2025 बाबत शुक्रवारी मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. 8 मे रोजी सायंकाळपासून पाकिस्तानकडून भारताच्या विविध भागांवर हल्ले करण्यात येत होते. त्यामुळे गुरुवारी धर्मशाला स्टेडियमवर मॅच सुरु असताना ब्लॅकआऊट करण्यात आलं आणि त्यानंतर सामना रद्द करण्यात आला.
8 मे रोजी धर्मशाला स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवला जात होता. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून फलंदाजीला निवडली. पंजाब किंग्सने फलंदाजी करत असताना 1 विकेट गमावून 122 धावा केल्या. मात्र 10.1 ओव्हर सुरु असताना पाकिस्तानच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर धर्मशाला स्टेडियमवर ब्लॅकआऊट करण्यात आलं, फ्लडलाइट्स बंद करण्यात आल्या. त्यानंतर आयपीएलकडून पंजाब विरुद्ध दिल्ली सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. सामना पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांना सुखरूप स्टेडियम बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पंजाब विरुद्ध दिल्ली सामना रद्द झाला हे घोषित करण्यात आले.
पाकिस्तान हल्ल्याच्या पाश्वभूमीवर धर्मशाला स्टेडियमवरचा पंजाब विरुद्ध दिल्ली सामना रद्द करण्यात आला असताना आता खेळाडूंना सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी विशेष ट्रेनची सुविधा करण्यात आलेली आहे. पठणकोट ते दिल्ली अशी विशेष ट्रेन नेण्यात येणार असून यामधून खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि आयपीएल ब्रॉडकास्टिंग स्टाफ इत्यादींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जाणार आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी 9 मे रोजी बीसीसीआय भारत - पाक तणावाच्या पाश्ववभूमीवर आयपीएल २०२५ बाबत निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावणार असल्याची माहिती दिली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितले की, 'सर्वांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्यासाठी आम्ही एक विशेष ट्रेन आयोजित करत आहोत. सध्या सामना रद्द करण्यात आला आहे आणि स्टेडियम रिकामे करण्यात आले आहे. उद्या परिस्थितीनुसार आम्ही स्पर्धेच्या भविष्याचा निर्णय घेऊ. सध्या तरी खेळाडूंची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे". शुक्रवार 9 मे रोजी आयपीएल 2025 बाबत बीसीसीआयने अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. बीसीसीआयला खेळाडूंची सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयपीएल 2025 रद्द केलं जाऊ शकतं. शुक्रवारी बीसीसीआयच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं गरजेचं आहे.