Bengluru Stampede Case : आरसीबीच्या विजयी मिरवणुकी दरम्यान चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला. यानंतर आता बीसीसीआय (BCCI) ऍक्शन मोडमध्ये आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या आयपीएल विजयोत्सवादरम्यान घडलेल्या भयानक घटनेनंतर, बोर्ड भविष्यात अशा कार्यक्रमांचे नियमन करण्यासाठी औपचारिक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा विचार करत आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकियाने क्रिकबझशी बोलताना म्हटले की, 'आयपीएलसह भारतात होणाऱ्या इतर लीगमध्ये भविष्यात विजेतेपद पटकावल्यानंतर त्याचा जल्लोष करण्यासंदर्भात काही मानदंड निर्धारित करण्यावर विचार केला जाईल'. सैकिया पुढे म्हणाले की, 'कोणत्या न कोणत्या स्तरावर बीसीसीआयला काही न काही करावे लागेल. आपण मुकदर्शक बनून राहू शकत नाही'.
आरसीबीचा विजयोत्सव हा फ्रेंचायझीने वैयक्तिकपणे केलं होतं, परंतु सैकियांनी हे मान्य केलं की या आयोजनामुळे झालेल्या परिणामांना क्रीडा क्षेत्रातील मोठ्या परिसंस्थेपासून वेगळे करता येणार नाहीत. सैकियांनी म्हटले की, 'हे सेलिब्रेशन आरसीबीची वैयक्तिक गोष्ट होती. परंतु बीसीसीआयमध्ये आम्ही भारताच्या क्रिकेटसाठी जबाबदार आहोत. पण आम्ही याची काळजी घेऊ की भविष्यात अशा घटना घडणार नाहीत'.
हेही वाचा : 'मी श्रेयसच्या दोन मुलांची आई...' अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; लग्नाबद्दल काय बोलून गेली?
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात जबाबदार असलेल्या लोकांवर कर्नाटक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर बेंगळुरू पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) फ्रँचायझी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघ (KSCA) आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी DNA एंटरटेनमेंट यांच्याविरुद्ध गंभीर आरोपांसह FIR दाखल केला आहे. यात आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसले सह तीन लोकांना अटक केली आहे. आरसीबीने तब्बल 18 वर्षांनी आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. यापूर्वी 2009, 2011 आणि 2016 मध्ये फायनलला पोहोचून सुद्धा त्यांना विजय मिळवणं शक्य झालं नव्हतं.