Champions Trophy 2025 Final: भारतीय संघ आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचला आहे. भारताने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्सने पराभूत करत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. ऑस्ट्रेलियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. 2023 च्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये अहमदाबादच्या स्पर्धेत भारताला पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा वचपा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने मंगळवारी दुबईच्या मैदानावर काढला.
भारताने सेमी-फायनलचा सामना जिंकल्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे. भारत फायनलमध्ये पोहचल्यास अंतिम सामना दुबईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार आता अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबईत होणार हे निश्चित झालं आहे. विशेष म्हणजे यावरुनच माजी फिरकीपटू हरभजन सिंगने पाकिस्तानला डिवचलं आहे.
आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये भारताने दमदार एन्ट्री मारली. भारताने चार विकेट्स आणि 11 चेंडू राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 264 धावांपर्यंत मजल मारली. 264 वर ऑस्ट्रेलियन संघ तंबूत परला. धावांचा पाठलाग करताना भारताने सुरुवातीला काही विकेट्स गमावल्यानंतर श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने केलेल्या संयमी फलंदाजीच्या मदतीने भारताने डाव सावरला. विराट कोहलीने 84 धावांची खेळी केली. के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्यानेही चांगली साथ दिली. भारताने 48.1 ओव्हरमध्ये सामाना जिंकला. आज होणाऱ्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सेमी-फायनलमधून भारताविरुद्ध कोण फायनल खेळणार हे स्पष्ट होणार आहे.
भारताच्या विजयानंतर माजी फिरकीपटू हरभजन सिंगने पाकिस्तानला डिवचलं आहे. पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता फायनलचा सामनाही यजमान पाकिस्तानमध्ये होणार नाही. भारताच्या विजयानंतर हरभजनने आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करताना, "आधी पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आणि फायनलचा सामना पाकिस्तानातून बाहेर पडला," असं म्हटलं आहे.
पहले
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 4, 2025
पाकिस्तान टूर्नामेंट से बाहर।
और अब
फाइनल पाकिस्तान से बाहर
भारताने याच स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा सामना सहा विकेट्सने जिंकला. हा सामना 23 फेब्रुवारी रोजी झाला. विराट कोहलीने या सामन्यात शतक झळकावत भारताला विजय मिळवून दिलेला. सुरेक्षच्या कारणाने भारताने पाकिस्तानला जाणार नसल्याचं स्पर्धेपूर्वीच स्पष्ट केलेलं. त्यानुसार भारताचे सर्व सामाने दुबईमध्ये खेळवण्यात आले.