इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेतून श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) वगळणं भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) रुचलेलं नसून, त्याने नाराजी जाहीर केली आहे. श्रेयस अय्यर मागील वर्षभरापासून जबरदस्त फॉर्ममधे आहे. आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताना श्रेयस अय्यर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मधल्या फळीतील फलंदाजीसाठी श्रेयस अय्यरचं नाव सुचवण्यात आलं होतं. पण इंग्लंड दौऱ्यात त्याला संघात स्थान मिळालं नाही. सौरव गांगुलीच्या मते श्रेयस अय्यरला त्याच्या सध्याच्या फॉर्मच्या आधारे निवडायला हवं होतं. तो असा खेळाडू नाही, ज्याला बाहेर बसवणं अपेक्षित आहे असं त्याने म्हटलं आहे.
"मागील एक वर्षापासून तो सर्वोत्तम खेळी करत आहे. तो या संघात असायला हवा होता. त्याच्यासाटी मागील एक वर्ष जबरदस्त गेलं आहे. तो असा खेळाडू नाही ज्याला संघाबाहेर ठेवायला हवं. तो आता दबावात असतानाही चांगली कामगिरी करत आहे. तो शॉर्ट बॉलही चांगल्या पद्धतीने खेळतो. कसोटी क्रिकेट वेगळं असलं तरी, मी त्याला संघात घेत तो नेमकी काय कामगिरी करतो हे पाहिलं असतं," असं सौरव गांगुलीने RevSportz शी संवाद साधताना म्हटलं.
दरम्यान एका रिपोर्टनुसार, भारत अ विरुद्ध लायन्स संघाकडून झालेल्या दोन चार दिवसांच्या सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर, भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी किशोरवयीन वेगवान गोलंदाज एडी जॅकला इंग्लंडच्या वरिष्ठ संघासोबत सराव करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.
20 जूनपासून हेडिंग्ले येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यासह इंग्लंडविरोधातील पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. नॉर्थम्प्टनमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या भारताच्या फलंदाज केएल राहुलला बाद करून 19 वर्षीय हॅम्पशायरच्या या वेगवान गोलंदाजाने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.