भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे माजी निवडकर्ते वेंकटपती राजू (Venkatapathy Raju) यांनी शुभमन गिलने (Shubman Gill) कर्णधारपदाच्या नियुक्तीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं असं मत मांडलं आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलं असून, ऋषभ पंत उप-कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. भारतीय संघ इंग्लंडविरोधात पाच कसोटी सामने खेळणार आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराट कोहलीकडे पुन्हा कर्णधारपद जाईल अशी शक्यता असतानाच त्यानेही निवृत्तीची घोषणा केली होती. वेंकटपती राजू यांनी कर्णधारपदाच्या जबाबदारीचा शुभमन गिलच्या खेळावर नकारात्मक परिणाम होऊ नये असं सांगितलं असून, रोहित शर्माचं उदाहरण दिलं आहे.
"रोहित शर्मा काय होता? रोहित शर्मा जेव्हा कसोटी खेळत होता तेव्हा संघर्ष करत होता, बरोबर ना? पण नंतर त्याला मुंबई इंडियन्सचं नेतृत्व मिळालं आणि त्याने ट्रॉफी जिंकल्या. त्याच्या खेळण्याची पद्धत अचानक बदलली. त्यानंतर तो भारतीय संघाचा कर्णधार झाला, बरोबर? जेव्हा तो कर्णधार झाला तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली," असं वेंकटपती राजू यांनी हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना म्हटलं.
वेंकटपती राजू यांनी यावेळी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथचंही उदाहरण दिलं, जो तरुण वयात कर्णधार झाला आणि परिस्थिती कशी हाताळायची हे शिकला. "गिल सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा भाग आहे, बरोबर? मला येथे ग्रॅमी स्मिथचं उदाहरण द्यायचं आहे. जेव्हा ग्रॅमी स्मिथ दक्षिण आफ्रिकेसाठी खूप तरुण होता. जेव्हा त्याला कर्णधार बनवण्यात आलं तेव्हा तो फक्त 19 वर्षांचा होता. त्याने संघात खूप फरक पाडला," असं ते म्हणाले.
"आता निवडकर्त्यांनी शुभमन गिलला संधी देण्याचं ठरवलं आहे. आता संघातील वरिष्ठ खेळाडूंवर सर्व आहे, संघातील सर्वांना त्याला पाठिंबा द्यायला हवा. कारण हा सांघिक खेळ आहे. हे कदाचित त्याच्या खेळण्याच्या पद्धतीला आव्हान असेल. तो जास्त जबाबदार होईल. कदाचित तो थोडा चिंताग्रस्त वाटू शकतो. पण हेच तर क्रिकेट आहे. हे आव्हान आहे. त्याला ही आव्हानं स्विकारावी लागतील. त्याला पाच कसोटी सामने मिळाले आहेत. आशा आहे की, तो यामधून शिकेल आणि त्याला माहिती आहे तशी खेळी करेल," असंही त्यांनी म्हटलं आहे.