Rohit Sharma : भारताच्या टेस्ट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 7 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्माने यापूर्वीच 2024 मध्ये टी 20 क्रिकेटमधून सुद्धा निवृत्ती घेतली होती. मात्र तो वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे. मैदानात संघाचं नेतृत्व करत असताना रोहित शर्मा अनेकदा खेळाडूंना रागवायचा तर कधी कौतुक सुद्धा करायचा. खेळाडू आणि रोहित शर्मामधील हे बोलणं हे स्टंप माईकमध्ये कैद व्हायचं आणि त्याचे व्हिडीओ व्हायरल व्हायचे. तेव्हा टेस्ट आणि टी 20 मधील निवृत्तीनंतर रोहित शर्माचे फॅन्स त्याचा हा आवाज मैदानावर खूप मिस करतील. वाढदिवसानिमित्त रोहित शर्माची एक मुलाखत घेण्यात आली. यानिमित्ताने त्याने विविध विषयांवर भाष्य केलं, त्यातीलच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यातील रोहितचं बोलणं ऐकून अनेकांना हसू आवरत नाहीये.
रोहित शर्मा आणि संघातील खेळाडूंचं कनेक्शन याबाबत रोहितला मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. ज्याचं त्यानं असं उत्तर दिलं की कोणालाच हसू आवरलं नाही. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात रोहित शर्मा म्हणाला की, 'खेळाडूंसोबत गंदी बातें (वाईट गोष्टी) बोलायला हव्यात'. तेव्हा मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं की, 'तुम्ही टफ टॉकबाबत बोलत आहात'. हे ऐकून रोहित म्हणाला. 'तू फक्त चुकीच्या गोष्टींचाच विचार करतोस'. मग काय उपस्थित असलेल्या आणि मुलाखत पाहणाऱ्या सर्वांना हसू फुटले. रोहितला बोलायचं होतं की, ' गंदी बातें म्हणजे खेळाडूला का खेळवण्यात आलं नाही, इत्यादी.
shana being shana pic.twitter.com/Rl5CkYt7Q9
— sw (areyyswaraa) May 12, 2025
रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेटमधील असा खेळाडू आहे जो त्याच्या हजर जबाबीपणासाठी ओळखला जातो. तो कोणत्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला अजिबात घाबरत नाही. याच कारणाने रोहितचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच त्याची मुंबई स्टाईल हिंदीच्या सुद्धा अनेक चर्चा रंगतात.
हेही वाचा : IPL 2025 पुन्हा सुरु होण्याच्या 2 दिवसाआधीच 'हे' स्टेडियम बॉम्बने उडवण्याची धमकी, पाकिस्तान कनेक्शन आलं समोर
आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असताना रोहित शर्माने आपल्या चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. यात तो म्हणाला की, 'सर्वांना नमस्कार, मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या रंगात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक महत्वाचा सन्मान राहिलाय.गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी वनडे क्रिकेट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळत राहीन'.
टीम इंडियाचा टेस्ट संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माची कारकीर्द अतिशय उत्तम ठरली. त्याने 67 टेस्ट सामने खेळताना 4302 धावा केल्या. दरम्यान त्याने 18 अर्धशतकं, 12 शतकं तर 1 द्विशतक सुद्धा लगावलं. या दरम्यान त्याने गोलंदाजी करताना 2 विकेट सुद्धा घेतल्या आहेत. 2013 रोजी इडन गार्डन स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर त्याचा शेवटचा टेस्ट सामना त्याने 26 डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान खेळला.