Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

श्रेयस अय्यरला टेस्ट टीममधून का वगळलं? गंभीरचं मोजून 3 शब्दात उत्तर; म्हणाला, 'मी...'

Gautam Gambhir On Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला संघातून वगळण्यामागे गौतम गंभीर असल्याची जोरदार चर्चा सुरु असताना गंभीर काय म्हणालाय जाणून घ्या...

श्रेयस अय्यरला टेस्ट टीममधून का वगळलं? गंभीरचं मोजून 3 शब्दात उत्तर; म्हणाला, 'मी...'

Gautam Gambhir On Shreyas Iyer: भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने बुधवारी श्रेयस अय्यरला इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघात स्थान न देण्यात आल्याबद्दल भाष्य केलं आहे. गंभीरने पत्रकारांशी बोलताना 3 जून रोजी भारतीय संरक्षण दलातील सदस्यांना बीसीसीआयने आयपीएलच्या फायनलसाठी आमंत्रित करण्याच्या निर्णयाचं कौतुक केलं. मात्र श्रेयस अय्यरला कसोटी संघात समावेश नसल्यासंदर्भात विचारलं असता त्याने मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. 20 जूनपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी 18 खेळाडूंचा संघ जाहीर झाला असून त्यात श्रेयस अय्यरचा समावेश नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच गंभीरने हे विधान केलंय.

मागील वर्षी श्रेयस कर्णधार अन् गंभीर कोच असताना...

तब्बल 11 वर्षानंतर पंजाब किंग्जच्या संघाला प्लेऑफमध्ये घेऊन जाण्याबरोबरच पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या श्रेयसच्या नेतृत्वाखालीच मागील वर्षी म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये कोलकात्याच्या संघाने तिसऱ्यांदा आयपीएलचा चषक जिंकला होता. विशेष म्हणजे त्यावेळी कोलकात्याच्या संघाचं प्रशिक्षकपद गंभीरकडे होते. त्यामुळेच श्रेयसची निवड न झाल्याबद्दल गंभीरला पत्रकारांनी विचारलं असता त्याने या प्रश्नाला बगल दिल्याचं पाहायला मिळालं.

अवघ्या तीन शब्दांमध्ये गंभीरने विषय संपवला

अनेकांनी गंभीरमुळेच श्रेयसकडे निवड समितीने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावरुन गंभीरवर श्रेयसच्या चाहत्यांनी गंभीर आरोप करताना क्रिकेटमध्ये राजकारण केलं जात असल्याचंही म्हटलं आहे. श्रेयसने घरगुती क्रिकेट स्पर्धांपासून ते अंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत सगळीकडे आपल्या खेळाची छाप सोडलेली असतानाही त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आलं नाही. यावरुन अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. असं असतानाच श्रेयसला वगळण्यात आल्याचा उल्लेख करत प्रश्न विचारला असता गंभीरने मोजक्या शब्दात उत्तर दिलं. श्रेयसचा समावेश संघात नसल्यावरुन प्रश्न विचारण्यात आला असता गंभीरने, 'मी सिलेक्टर नाही' असं मोजून तीन शब्दांमध्ये उत्तर दिलं.

श्रेयस असा एकमेव कर्णधार ज्याने

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबने केलेल्या या चमकदार कामगिरीमुळे श्रेयसच्या नावावर एक आगळावेगळा विक्रम नोंदवला गेला आहे. श्रेयसच्या नावाची आयपीएलच्या इतिहासात एका अनोख्या विक्रमासाठी नोंद झाली आहे. पंजाब प्लेऑफमध्ये पात्र ठरल्याने श्रेयस असा एकमेव कर्णधार झाला आहे ज्याच्या नेतृत्वाखाली तीन वेगवेगळे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. या पूर्वी श्रेयसने दोन वेगळ्या संघांचं नेतृत्व करताना त्यांना प्लेऑफपर्यंत नेलं होतं. श्रेयस अय्यर पहिल्यांदा 2018 साली दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. त्यानंतर त्याने 2020 मध्ये संघाचं नेतृत्व करताना त्यांना पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी पोहचवत प्लेऑफसाठी पात्र ठरवलं. या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात पोहोचलेल्या दिल्लीचा मुंबईच्या संघाने पराभव केला होता.  2024 च्या आयपीएलमध्ये श्रेयसने कोलकात्याच्या संघाचं नेतृत्व केलं होतं. श्रेयसच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत श्रेयसने कोलकात्याला तिसऱ्यांदा जेतेपद मिळवून देण्याची कामगिरी केली होती. 

 

Read More