Gautam Gambhir on Rohit, Virat Retirement: भारतीय क्रिकेट संघ आता इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, येथे पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी (Gautam Gambhir) हा दौरा फारच आव्हानात्मक असणार आहे. याचं कारण या दौऱ्यात संघामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि आर अश्विन (R Ashwin) यांच्यासारखे मोठे खेळाडू नसणार आहेत. या तिन्ही खेळाडूंनी कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे गौतम गंभीरला आता खऱ्या अर्थाने स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे. दरम्यान गौतम गंभीरने पहिल्यांदाच रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीवर भाष्य केलं असून, त्या दोघांची जागा घेणे कठण असेल तरी पुढील पिढी आता जबाबदारी घेण्यास तयार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
"हो, आम्हाला दोन वरिष्ठ खेळाडूंशिवाय खेळावं लागणार आहे. कधीकधी ही इतर खेळाडूंसाठी संधी असते, ज्यांनी पुढाकार घेऊन आता आम्ही तयार आहोत असं सांगण्यासाठी. त्यामुळे हे नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. पण काहीजण नक्कीच जबाबदारी घेण्यासाटी पुढाकार घेतील. मला याआधीही यासंबंधी विचारणा झाली होती," असं गौतम गंभीरने Cricket Next शी बोलताना म्हटलं.
गौतम गंभीरने याला दुजोरा देताना भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याचं उदाहरण दिलं. जसप्रीत बुमराह अनुपस्थित असतानाही भारताने चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकल्याची आठवण त्याने करुन दिली. गंभीर म्हणाला की, "चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्येही जसप्रीत बुमराह खेळत नव्हता. तेव्हाही मी हीच गोष्ट बोललो होतो. एखाद्याची अनुपस्थिती एखाद्याकडे देशासाठी काहीतरी मोठं करण्याची संधी असते. काही खेळाडू या संधीची वाट पाहत असतील अशी आशा आहे".
रोहित आणि विराटच्या कसोटीमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाबद्दल विचारलं असता, गंभीरने हा वैयक्तिक निर्णय असून संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीमधील कोणालाही खेळाडूवर जबरदस्ती करण्याचा अधिकार नाही असं स्पष्ट केलं. गौतम गंभीर म्हणाला, "मला वाटतं, जेव्हा तुम्ही खेळ सुरु करता आणि जेव्हा तुम्हाला थांबायचं असतं तेव्हा तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो".
पुढे तो म्हणाला की, "इतर कोणालाही अधिकार नाही. मग तो प्रशिक्षक असो, निवडकर्ता किंवा देशातील कोणीही असो. इतर कोणालाही तुम्ही कधी निवृत्त व्हावं हे सांगण्याचा अधिकार नाही. हा आपल्या आतून आलेला आवाज ऐकून घेतलेला निर्णय असतो".