Harbhajan Singh Emotional: तुम्ही आयपीएलचे पुर्वीपासूनचे चाहते असाल तर 2008 मधील ती घटना तुम्हाला आजही लख्ख आठवत असेल. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन दरम्यान मॅचवेळी हरभजन सिंहने श्रीसंथच्या कानाखाली मारली. श्रीसंथला रडू आलं. आता 17 वर्षांनंतर हे प्रकरण पुढे का आलंय? असं तुम्हाला वाटत असेल तर त्यामागे कारणही तसंच घडलंय. कारण श्रीसंथची लेक हरभजन सिंहला असं काही बोलली ते ऐकून त्याला रडू कोसळलं. माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंहला त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील एका घटनेचा नेहमीच खेद वाटतो, ती म्हणजे 2008 मध्ये श्रीसंतसोबत घडलेला 'थप्पड कांड'. या घटनेने भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ माजवली होती. अलीकडेच हरभजनने या प्रकरणाशी संबंधित एका भावनिक प्रसंगाचा खुलासा केला.
जेव्हा मी श्रीसंतच्या मुलीला भेटलो तेव्हा मी तिच्याशी खूप प्रेमाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण तिने माझ्याशी प्रेमाने बोलण्यास नकार दिला. ज्यामुळे मला अपराधी भावना निर्माण झाली आणि पश्चात्ताप झाल्याचे हरभजन सिंह म्हणाला.
ही वादग्रस्त घटना मोहाली येथे मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यानंतर घडली होती.सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या हरभजनने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनादरम्यान श्रीसंतला कानाखाली मारली. पंजाबच्या विजयानंतर श्रीसंतने हसत 'हार्ड लक' असे म्हटले. ज्यामुळे हरभजन चिडला. या घटनेनंतर श्रीसंतच्या डोळ्यातील अश्रूंचे फोटो खूप व्हायरल झाले. हरभजनवर त्या आयपीएल हंगामाच्या उर्वरित सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली. या घटनेमुळे खूप वाद निर्माण झाला आणि दोन्ही खेळाडूंमध्ये तणाव वाढला.
या घटनेनंतर हरभजनवर आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी बंदी घालण्यात आली आणि त्याला दंडही ठोठावण्यात आला. श्रीसंतच्या भावनिक प्रतिक्रियेमुळे आणि हरभजनच्या कृतीमुळे या घटनेने खूप वाद निर्माण केला. यानंतर हरभजन सिंह याने श्रीसंथची माफी मागितली. या घटनेमुळे हरभजन आणि श्रीसंत यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले, परंतु कालांतराने दोघेही यातून पुढे गेले.हरभजनने या घटनेचा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम झाल्याचे सांगितले आणि तो ही चूक पुन्हा करणार नाही याची खबरदारी घेत असल्याचे म्हटले.या घटनेने क्रिकेट विश्वात खेळाडूंमधील शिस्त आणि मैदानावरील वर्तनावर चर्चा घडवून आणली.
या घटनेनंतरही दोघे भारताचे प्रतिनिधित्व करताना एकत्र दिसले. 2011 चा विश्वचषक जिंकला तेव्हा दोघेही एकत्र दिसले. हरभजनने रविचंद्रन अश्विनच्या 'कुट्टी स्टोरीज' या शोमध्ये सांगितले. "माझ्या आयुष्यात एक गोष्ट बदलायची असेल, ती म्हणजे श्रीसंतसोबतची ती घटना, असे हरभजन म्हणाला. माझ्या कारकीर्दीतून ती घटना कायमची पुसून टाकावी अशी माझी इच्छा आहे. मी जे केले ते चुकीचे होते. ज्यासाठी मी 200 वेळा माफी मागितली आहे. प्रत्येक संधी आणि व्यासपीठावर मी माफी मागत राहिलोय. ती माझी चूक होती, असे हरभजनने म्हटले.
मी श्रीसंथच्या मुलीशी खूप प्रेमाने बोलत होतो. पण ती म्हणाली, 'मला तुझ्याशी बोलायचे नाही. तू माझ्या वडिलांना मारलेस.' त्या क्षणी माझे हृदय पिळवटले. मी स्वतःला विचारले की, मी तिच्यावर काय परिणाम केला? ती मला फक्त त्या माणसाच्या रूपात पाहते ज्याने तिच्या वडिलांना मारले. मला खूप वाईट वाटले. मी आजही तिची माफी मागतो. कारण मी आता काहीही करू शकत नाही.'